लघुचित्रपट दिग्दर्शक उल्हास पीआर यांनी बॉलीवूड अभिनेता आमिर खानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘पीके’ चित्रपटात आमिरने दिल्ली पोलिसाला ‘ठुल्ला’ म्हणून संबोधल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीतील अशोकनगर पोलीस ठाण्यात उल्हास यांनी तक्रार नोंदविल्याचे कळते. दरम्यान, याच कारणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही तक्रार दाखल झालेली आहे. आयएएनएसशी बोलताना उल्हास म्हणाले की, २६ जुलैला मी ‘पीके’ हा चित्रपट टीव्हीवर पाहिला. एका दृश्यात आमिर पोलिसाला ठुल्ला म्हणून संबोधतो. याच कारणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात येते तर मग आमिर खानवर का नाही? असा प्रश्न उल्हास यांनी केला. त्याचे चित्रपट तर जागतिक स्तरावर पाहिले जातात. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी आमिरचा शत्रू नाही की, केजरीवाल यांचा मित्र नाही. पोलीस यावर किती लवकर कारवाई करतात ते मला पाहायचयं, असेही ते म्हणाले.