टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडानमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसंच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत त्याने आपलं आयुष्य संपवलं. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ तसंच अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत काम केलं होतं.

घराचं भाडं देण्यासाठीही नव्हते पैसे
आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने लॉकडाउनमुळे मनमीत खूप त्रस्त होता. आर्थिक अडचणींमुळे आधीच अनेक समस्या असताना लॉकडानमुळे त्याच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. छोट्या भूमिकाही मिळत नसल्याने त्याचा तणाव वाढला होता. यामुळे अखेर त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की, घराचं भाडं देण्यासाठीही पैसे नव्हते. याच तणावाने अखेर त्याचा जीव घेतला.

वेब सीरिजमध्ये करत होता काम
मनमीनतने काही मालिकांव्यतिरिक्त जाहिरातींमध्येही काम केलं होतं. तसंच आठ एपिसोड असणाऱ्या एका वेब सीरिजमध्येही काम करत होता. यामधील तीन एपिसोडमध्य तो दिसणार होता. याशिवाय अनेक अॅक्टिंग स्कूलमध्ये तो शिकवण्यासाठी जात होता. पण लॉकडाउनमुळे हे सगळंच बंद पडलं होतं.