‘गुन्हेगारी विश्व’ बॉलिवूडकरांचा हक्काचा असा विषय. सत्तरच्या दशकात ‘डॉन’, ‘दिवार’सारख्या चित्रपटापासून ते अगदी ‘सत्या’, ‘कंपनी’ आणि अगदी अलिकडचा ‘मुंबई सागा’पर्यंत सर्वच चित्रपटात दिग्दर्शकांनी आपापल्या परीने हे विश्व दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता याच विषयात मराठी चित्रपटसृष्टीनेही आपलं नशीब आजमावायला सुरवात केली आहे. २०१५ साली ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता ८ वर्षांनी याच चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सूर्या’ नावाच्या एका सामान्य मुलाचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास आणि त्याची हटके प्रेम कहाणी पहिल्या चित्रपटात पहायला मिळाली होती. आता पुढच्या भागात मात्र गुन्हेगारी विश्व सोडलेला हाच सूर्या पुन्हा या गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो हे पहायला मिळणार आहे.

चित्रपटाची सुरुवात डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांच्या निवडणूक लढण्याची घोषणेने होते. यामुळे सत्ताधारी पक्षातील लोकांचे धाबे दणाणतात. कारण डॅडींना मिळणारा अनेकांचा पाठिंबा. त्यातच एका कामगार नेत्याच्या हत्येमुळे पोलिसांची संशयाची सुई थेट डॅडीपर्यंत येऊन पोहचते. आपल्याला कोणीतरी अडकवत आहे हे लक्षात आल्यावर डॅडी आपला हुकूमी एक्का अर्थात सूर्याला पुन्हा बोलवण्याचा निर्णय घेतात. पण सूर्या चाळ सोडून गावाला निघून गेलेला असतो. डॅडींच्या विनंतीला तो नकार देतो. कारण संसारात अडकलेल्या सूर्याने बायकोला वचन दिलेले असते की तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात जाणार नाही…
आणखी वाचा- सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट

मात्र या दरम्यान काही घटना अशा घडतात की डॅडींनी सूर्याला आपल्या ज्या कामासाठी बोलवलेलं असतं त्याऐवजी सूर्या आणि डॅडींमध्ये संघर्ष सुरू होतो… तो यशस्वी होतो का? या दरम्यान नेमकं काय घडतं? यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.

एकूणच सत्ता मिळवण्यासाठी गुन्हेगारीचा क्षेत्राचा कसा वापर केला जातो हे या चित्रपटात दाखवले गेले आहे. पहिल्या भागात डॅडींसाठी काम करणारा सूर्या दुसऱ्या भागात डॅडीच्या विरोधात कसा जातो हे यात पहायला मिळणार आहे. दुसऱ्या भागात दिग्दर्शकाने मागच्या भागाशी ठेवलेला फ्लॅशबॅक उत्तम जमून आला आहे. चित्रपट बघताना कुठेही मराठी चित्रपट पाहतो असा भासही होत नाही. चित्रपटातील काही सीन्सवर टाळ्या शिट्या नक्कीच पडणार आहेत.

‘चाळ कधीच काही विसरत नाही’, ‘चाल के दरवाजे लोहे के हैं’ यासारखे संवाद आणखी मज्जा आणतात. चित्रपटाचे संकलन उत्तम आहे, चित्रपट कुठेही रेंगाळत नाही, यात दिग्दर्शकाने बाजी मारली आहे. पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला साजेसे आहेत. बाकी कलाकारांचे अभिनय आणि मकरंद देशपांडेंनी साकारलेले डॅडी लक्षात राहतात. यानिमित्ताने अंकुश आणि पूजाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मिळत आहे. तर डेझी शाह गाण्याच्या रुपात पहिल्यांदा मराठी चित्रपटात दिसली आहे. पाहुणा कलाकार म्हणून अशोक समर्थही उठून दिसतो.

आणखी वाचा- Digital Adda: असा घडला ‘दगडी चाळ २’ चित्रपट, पडद्यामागचे किस्से आणि बरंच काही

अर्थात या चित्रपटाच्या शेवटी काही अनपेक्षित असे धक्के बघायला मिळतात ज्याची प्रेक्षकांनी अपेक्षाच केलेली नसते आणि जाता जाता हा चित्रपट तिसऱ्या भागाची चाहूल देऊन जातो.

सामन्यात आपल्याकडे चित्रपटाचा पुढचा भाग एक तर निराशावादी असतो अथवा मागच्या भागाशी त्याचा संबंध नसतो. मात्र यात असे नाही, खऱ्या अर्थाने हा चित्रपट पुढचा भाग आहे जो मागच्या भागाला विसरत नाही…

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daagadi chawl 2 marathi movie review ankush chaudhari pooja sawant makarand deshpande spg
First published on: 19-08-2022 at 15:09 IST