२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. अभिनेते मकरंद देशपांडे यांनी या चित्रपटामध्ये साकारलेली अरुण गवळी यांची भूमिका तर प्रचंड गाजली. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाच्या पोस्टरचे आणि ट्रेलरचे अनावरण दगडी चाळीत अरुण गवळींच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यानचा खास व्हिडीओ डॅडींचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारेने शेअर केला आहे.

आणखी वाचा – Takatak 2 Trailer : ‘टकाटक २’चा सर्वात बोल्ड ट्रेलर प्रदर्शित, इंटिमेट सीन अन् संवादांमुळे चित्रपट चर्चेत

‘दगडी चाळ २’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीनच वाढली आहे. “चाळ काही विसरत नसते! जय शंभु नारायण” असं म्हणत अक्षयने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अरुण गवळी कलाकारांशी संवाद साधताना दिसत आहेत. “सगळ्या कलाकारांना माझा आर्शिवाद आणि धन्यवाद” असं अरुण गवळी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

तसेच चित्रपटामधील मुख्य कलाकार अंकुश चौधरी, पुजा सावंत यांनी देखील या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘दगडी चाळ’ चित्रपटातील ‘चुकीला माफी नाही’ हा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागात ‘चाळीचे दरवाजे इतके कमजोर नाहीत की उभं राहायला वाऱ्याचा आधार घेतील’, ‘चाळ काही विसरत नसते’, असे विविध संवाद चर्चेत आले आहेत.

आणखी वाचा – यावर्षी चिपळूणमध्ये पूर का आला नाही? अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं कारण

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी केली आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका आहेत.