दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत तिची अशी नवी ओळख प्रस्थापित करु पाहात आहे. 'धडक' या चित्रपटाच्या निमित्ताने ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने ती विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. आपल्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी खुद्द जान्हवीही फारच उत्सुक आहे. पण, त्यासोबतच ती आणखी एका गोष्टीसाठी उत्सुक आहे. ती गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाचा सण. भाऊ- बहिणीच्या नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा समजला जाणारा हा दिवस यंदा जान्हवीच्या आयुष्यातही एक नवं वळण आणणार आहे. कारण, यंदा ती पहिल्यांदाच आपल्या भावाला म्हणजेच अभिनेता अर्जुन कपूरला राखी बांधणार आहे. 'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीनेच याविषयीची माहिती दिली. 'यंदाचा रक्षाबंधनाचा सण माझ्यासाठी खूप खास असेल, कारण पहिल्यांदाच अर्जुनसोबत मी तो साजरा करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अर्जुनने मोठ्या जबाबदारीने मला आणि खुशीला सांभाळून घेतलं आहे. आम्हाला परिस्थितीचा सामना करण्यासाठी धीर दिला आहे. मोठा भाऊ म्हणून तो आमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला आहे', असं ती म्हणाली. Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का? अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर जवळपास २२ वर्षांनी कपूर कुटुंबातील या सावत्र भावंडांमध्ये असणारं अंतर मिटलं. अर्जुन आणि त्याची बहिण अंशुला यांनी आपल्या वडिलांना आणि सावत्र बहिणींचा स्वीकार करत त्यांना आधार दिला. पावलोपावली परिस्थितीशी लढण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं. सेलिब्रिटी भावंडांच्या नात्यात आलेला हा गोडवा चाहत्यांसाठी आणि कपूर कुटुंबियासाठी अतिशय सुखद आहे हेच खरं.