अभिनेत्री अंजली आनंद आगामी 'ढाई किलो प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला निर्मात्यांनी वजन वाढविण्यास सांगितले होते. मात्र, अंजलीने वजन वाढविण्याला साफ नकार दिल्याचे समजते. सध्या अंजलीचे वजन १०८ किलो इतके आहे. त्यामुळेच तिने वजन वाढविणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. टेलिव्हिजनवरील 'स्टार प्लस' या मालिकेतून अंजली छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. अंजलीने यासंदर्भात म्हटले की, "आयुष्यात मी नेहमीच सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. जी व्यक्ती सायकलिंग आणि ट्रेकिंगवर प्रेम करत असेल, ती व्यक्ती वजन वाढविण्यावर कधीच भर देणार नाही." तिच्या या वाक्यातून तिला सायकलिंग आणि ट्रेकिंगमध्ये विशेष आवड असल्याचे दिसते. पुढे ती म्हणाली, "आता माझे वजन १०८ किलो इतके आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आणखी वजन वाढविणे माझ्यासाठी कठीण आहे." स्टार प्लस वाहिनीवर ३ एप्रिलपासून 'ढाई किलो प्रेम' ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेच्या कथानकामध्ये दीपिका आणि पियूष या दोंघाच्या प्रेमाचा एक वेगळा रंग पाहायला मिळणार आहे. दीपिकाच्या व्यक्तिरेखेत अंजली दिसणार असून, पियूषची भूमिका मेहरजान माजदा साकारताना दिसेल. या मालिकेसाठी मेहरजानने देखील तब्बल १६ किलो वजन वाढविले आहे. मेहरजान यापूर्वी श्रद्धा कपूरच्या 'लव्ह का दि एण्ड' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. 'ढाई किलो प्रेम' या मालिकेत किश्वर मर्चेट विशेष भूमिकेत दिसणार आहे. २०१६ मध्ये सुयशसोबत विवाह बंधनात अडकलेली किश्वर मर्चेट 'शक्तिमान' कसोटी जिंदगी की', 'पिया का घर' या मालिकेत दिसली आहे. तसेच सलमान खानच्या 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वात देखील तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आगामी मालिकेविषयी बोलताना किश्वर म्हणाली की, मी या मालिकेच्या पहिल्या भागात दिसणार आहे. सुपंखाच्या भूमिकेत मी मुख्य अभिनेत्रीला त्रास देणार आहे, असे किश्चरने म्हटले आहे.