बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने पती साहिल संघापासून विभक्त झाल्याचे गुरुवारी सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर बॉलिवूडमधल्या आणखी एका जोडीने घटस्फोट दिल्याचं जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. ही जोडी म्हणजे लेखिका कनिका ढिल्लोन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी. या दोन्ही घटनांनंतर कनिका आणि दिया मिर्झाचा पती साहिल संघा यांचं एकमेकांशी अफेअर असल्याने घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या सर्व चर्चांवर आता दिया मिर्झाने मौन सोडलं आहे. कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे आमचा घटस्फोट झाला नाही असा खुलासा दियाने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. त्याचसोबत बेजबाबदारपणे अफेअरचे वृत्त देणाऱ्या प्रसारमाध्यमांनाही तिने खडेबोल सुनावले आहेत.

”साहिलपासून विभक्त झाल्यावरून ज्या काही चर्चा रंगत आहेत त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आणि त्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी हे ट्विट करत आहे. ही तर बेजबाबदारपणाची हद्दच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे माझ्या सहकाऱ्यांची नावं यात ओढली जात आहेत. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचं नाव अशाप्रकारे खोट्या वृत्तासाठी बेजबाबदारपणे वापरण्याचा मी तीव्र विरोध करते. साहिल आणि मी कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे विभक्त झालेलो नाहीत. आम्हाला थोडा वेळ द्या अशी विनंतीदेखील मी प्रसारमाध्यमांना केली होती,” असं दियाने ट्विटरवर लिहिलं.

आणखी वाचा : सलमानच्या मेहुण्यासोबत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचा डेब्यू

दियाने कनिकाचीही माफी मागितली. कनिकाने शुक्रवारी ट्विट करत साहिल आणि तिच्यात कोणत्याही प्रकारचे अफेअर नसल्याचे स्पष्ट केले होते. दिया मिर्झा व साहिल पाच वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. एकमेकांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचं दियाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं होतं. घटस्फोटानंतरही आमच्यात मैत्री कायम राहील असंही तिने त्यात म्हटलं होतं.