सध्या बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट तर प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला आहे. आमिरने तर याबाबत आपलं मत व्यक्त करत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी आवाहान केलं. आता दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपलं मत मांडलं आहे. अनुरागचा ‘दो बारा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

आणखी वाचा – “जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर…” ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर स्पष्टच बोलला आमिर खान

या चित्रपटानिमित्त इंडियन एक्सप्रेसशी अनुराग कश्यपने संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “मला जर आजच्या दिवसांमध्ये ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे चित्रपट बनवायचे असतील तर ते मी करू शकत नाही. मी खूप कथा लिहिल्या आहेत. राजकारण किंवा धर्म या विषयावर आधारित चित्रपट करायला कोणीही तयार होत नाही.”

“खूप विचित्र काळामध्ये सध्या आपण जगत आहोत. दोन वर्षानंतर अजूनही नेहमी सुशांत सिंग राजपूत ट्रेंड होत आहे. हे खरंच खूप विचित्र आहे जिथे सगळ्या गोष्टींवरच बहिष्कार टाकला जात आहे. राजकीय पक्ष, भारतीय क्रिकेट संघ या सगळ्यांना बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. आपल्या देशात आता बहिष्काराची संस्कृती रुजू पाहत आहे. जर तुमच्यावर बहिष्कार टाकला जात नसेल तर तुम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही.”

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षी लग्न अन् ३२ वर्षांचा सुखी संसार, मृणाल कुलकर्णी यांचे पतीबरोबरचे सर्वात सुंदर फोटो

याआधी अनुराग कश्यपने माझ्या ‘दो बारा’ चित्रपटावरही बहिष्कार टाकावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. अनुराग कश्यपच्या ‘दो बारा’मध्ये तापसी आणि पावेल पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघे २०२० मध्ये ‘थप्पड’ चित्रपटात एकत्र दिसले होते. ‘दो बारा’ हा एक साय-फाय थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिरेज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. येत्या १९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.