दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. काही दिवसांपूर्वीच समीरने 'सत्यनारायण की कथा' या नव्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. समीर विद्वांसने ट्वीट करत आगामी चित्रपट 'सत्यनारायण की कथा'चे नाव बदलणार असल्याचे सांगितले आहे. "कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही आगामी चित्रपट 'सत्यनारायण की कथा' चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. निर्मात्यांनी आणि क्रिएटीव्ह टीमने यासाठी पाठींबा दिला आहे. या चित्रपटाच्या नव्या नवाची घोषणा लवकरच करण्यात येईल" या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे. आणखी वाचा : शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हंगामा २’चा ट्रेलर प्रदर्शित pic.twitter.com/MHwQK1NxeO — Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) July 3, 2021 समीरच्या या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीरने ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्याची ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनने देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.