संगीत कुलकर्णी, चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक, निर्माते
ज्या साहित्याच्या माध्यमातून गोष्टी सांगितल्या जातात असे साहित्य वाचनाची आवड असलेले चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक, निर्माते संगीत कुलकर्णी यांना वाचनामुळे समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याची दृष्टी मिळाली.




वडील दत्ता केशव हे सुप्रसिद्ध लेखक, पटकथाकार, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक. त्यामुळे घरात साहित्याचा खजिना अशा वातावरणात माझा जन्म झाला. परंतु या घरातल्या कपाटात असलेल्या साहित्याचे महत्त्व जाणवण्या एवढेही वय नसल्यापासून माझ्यात वाचनाची आवड माझ्याही नकळत जोपासली गेली आणि यात सिंहाचा वाटा आहे माझ्या आईचा आणि वडील बंधूंचा. लहानपणापासून आईने सांगितलेल्या गोष्टी ऐकण्याचा छंद, राजाराणीच्या गोष्टी, परिकथा ऐकत मोठा होऊ लागलो. मग या गोष्टी स्वत: सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. सणासुदीच्या काळात नातेवाईक जमले की ऐकलेल्या गोष्टींचे सादरीकरण वडील बंधू सागरदादा आणि संगमदादा यांच्या सोबतीने करायचो. त्याला उत्स्फूर्त दादही मिळू लागली. यातूनच मग चांदोबा, किशोर, कुमार आदी पुस्तके वाचनात आली. या पुस्तकांचा प्रभाव इतका पडला की त्यातील व्यक्तिरेखा आजही ठसठशीतपणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या काळात कॉमिक्सचे मोठे आकर्षण, परंतु ही पुस्तके सहजपणे मिळत नसत. वाचनाचे एवढे वेड की मग मी दादरला माझ्या नातेवाईकांकडे गेलो की दादरचे पदपथ पालथे घालायचो. अगदी माहीम ते पोर्तुगीज चर्चचा परिसर फिरून रद्दीवाला शोधायचो आणि त्याच्याकडे मिळणारी फँटम, मँड्रेक्स, आर्ची, वॉल्ट डिस्ने आदी पुस्तके स्वस्तात मिळवायचो आणि वाचून काढायचो.
९वी व १०वीला असताना घरात वडील लिहिलेल्या कथा, पटकथांचे आधी घरच्यांसमोरच वाचन करायचे, त्याकाळी वडील बंधू सागर कुलकर्णी यांनीही लेखनाला सुरुवात केली होती. त्याचा परिणाम म्हणून घरातल्या कपाटांमध्ये दडलेल्या साहित्याच्या खजिन्याचे महत्त्व कळू लागले. जी.ए. कुलकर्णी, व.पु. काळे, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, सुहास शिरवळकर, आशा बगे, मेघना पेठे आदी साहित्यिकांनी केलेले लेखन वाचले. त्याचा फार मोठा प्रभाव आजही मला माझ्या व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात जाणवून येतो. या प्रत्येक लेखकाची लेखन शैली वेगवेगळी आहे. मात्र त्यांच्या साहित्यात जीवनात दररोज भेटणाऱ्या माणसांचे चित्रण, त्या पात्रांची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेली मांडणी अनुभवता आली. किरण नगरकर यांचे रावण आणि एडी, ककल्ड, प्रभाकर पेंढारकरांचे रारंगढांग, व्यंकटेश माडगूळकरांचे करुणाष्टक आणि वावटळ, अनंत सामंत यांचे एम.टी.आयवा मारु या साहित्याचाही विलक्षण प्रभाव माझ्यावर झाला.
पुढे चित्रपट आणि मालिका दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर या साहित्याचा माझ्या व्यावसायिक क्षेत्रात तर खूपच उपयोग झाला. चित्रपटात अथवा मालिकांमध्ये एखादी विशिष्ट घटना, व्यक्तिरेखा फुलवावी लागते, त्या व्यक्तिरेखांचे विविध पदर, कंगोरे उलगडून दाखवावे लागतात, त्यांचा विविध अंगाने अभ्यास करावा लागतो आणि इथे वाचनाचा फार मोठा फायदा होतो. वैयक्तिक जीवनातही अनेक प्रकारची, अनेक स्वभावाची माणसे भेटत असतात. भेटणारी माणसे अशी का वागली, त्यांनी केलेल्या कृतीमागे नेमका काय उद्देश होता हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेण्याची सवय मला लागली आणि हे केवळ साहित्य वाचनामुळेच शक्य झाले हे मी ठामपणे सांगू शकतो. या वाचनामुळे मनस्वी आनंद मिळाला आहे.
कामाच्या व्यापात वाचनासाठी हवा तसा वेळ देणे शक्य होत नाही. परंतु त्यातूनही वेळ मिळेल तेव्हा वाचन सुरू असते. अलीकडच्या काळात चेतन भगत थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, आमिष त्रिपाठी यांचे शिवा ट्रायोलॉजी, रॉबीन कुक यांचे कोमा, रिचर्ड बाक यांचे वन ही पुस्तके वाचली आहेत.