गायत्री हसबनीस

चित्रपट निर्मितीची सगळी अंगे अभ्यासून त्यात आपल्याला कुठपर्यंत जाता येईल, याची चाचपणी करत नवनवे प्रयोग करत राहणारा अभिनेता म्हणून अजय देवगणचा खास उल्लेख करता येईल. नव्वदच्या दशकात अभिनेता म्हणून कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतर केवळ अभिनयापुरते तो मर्यादित राहिला नाही. त्या त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत जे जे बदल झाले ते त्याने आत्मसात केले. त्याने खलनायकी भूमिकाही साकारल्या, तो निर्माताही झाला. आज दाक्षिणात्य चित्रपट असो वा आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ सारखा चित्रपट आपल्या भूमिकेची लांबी-रुंदी न बघता छोटेखानी व्यक्तिरेखेतूनही आपले अस्तित्व जाणवून देण्याचा त्याचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला आहे. अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या अजयचा ‘रनवे ३४’ हा नवा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. यात त्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच काम केलं आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

‘दाक्षिणात्य चित्रपट सध्या देशभर लोकप्रिय झाले आहेत हे स्पष्ट दिसते आहे. तरी हा काळ दाक्षिणात्य चित्रपटांचा नाही तर ‘भारतीय’ चित्रपटांचा आहे. दाक्षिणात्य चित्रपट चालतात असं म्हणण्यापेक्षा भारतीय चित्रपट चालतात’’, अशी भूमिका अजय देवगणने मांडली आहे. अजयची भूमिका असलेला एस. एस. राजमौल्ली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि एक हजार कोटींचा गल्ला या चित्रपटाने काही दिवसांत पार करत नवा विक्रम केला. दाक्षिणात्य चित्रपटांचे यश हे आत्ताचे नाही, असं तो म्हणतो. ‘बाहुबली’चा पहिला भाग, ‘केजीएफ’चा पहिला भाग तिकीटबारीवर जोरात चालले. तेव्हाच हे चित्रपट आणि दक्षिणेतील कलाकार मुख्य प्रवाहात आले, देशभर लोकप्रिय झाले, असं निरीक्षण त्याने नोंदवलं. चित्रपटांचं यश मोजण्याचे ठरावीक असे काही मापदंड नाहीत. त्यामुळे काही ठरावीक चित्रपटच चालतात असं म्हणणं उचित नसल्याचं तो सांगतो. 

‘रनवे ३४’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हुशार, जिद्दी तसेच बेशिस्त आणि आगाऊ अशा मिश्र छटा असणाऱ्या वैमानिकाची भूमिका अजयने या चित्रपटात केली आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना तो म्हणतो, हा वैमानिक नियमांचे पालन न करणारा आहे. त्याच्या या स्वभावामुळे पुढे त्याच्या कामात त्याला अडचण येते आणि ती अडचण कशी, का व कधी येते? हे दाखवण्याचा प्रयत्न यात आहे. एका हुशार म्हणून मानल्या जाणाऱ्या वैमानिकाच्या हातून चूक नक्की कशामुळे घडली? ही गोष्ट अतिशय रोमांचक आणि थरारक शैलीत चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्याने सांगितलं. अजयने या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. अजयने यापूर्वीही ‘शिवाय’सारखा थरारपट केला असल्याने त्याच धाटणीच्या या दुसऱ्या चित्रपटाबद्दलही जनमानसात उत्सुकता आहे. 

‘रनवे ३४’ ही एक सत्य घटना असून चित्रपटाचा साचाही थरारपटाचा झाला आहे. सध्या ओटीटी म्हणा किंवा बॉक्स ऑफिस म्हणा अ‍ॅक्शनपटांची हल्ली रांग लागलेली पाहायला मिळते. त्यामुळे तसा काहीसा विचार अजयनेही केला आहे का? यावर व्यक्त होताना तो म्हणतो, ‘‘मला कथा फार आवडली त्यातून एकदा एक कथा आवडली की तुम्ही काही काळ तरी आजूबाजूचा विचार करत नाही. या संहितेवर काम सुरू करताना माझं तसंच काहीसं झालं होतं. अ‍ॅक्शनपटांचा प्रभाव माझ्यावर पहिल्यापासून आहे, मीही अनेक अशा चित्रपटांतून कामं केली असल्याने साहजिकच चित्रपट करताना त्या शैलीचा प्रभाव जास्त पडतो’’, असं त्याने सांगितलं. ‘‘विमान, मग त्यातून होणारा अपघात, यातून येणारी  बेचैनी, थरार, अ‍ॅक्शन अशा नाना गोष्टी एकत्रितपणे दाखवणं हे अत्यंत कठीण काम आहे, कारण त्यासाठी खूप विचार करावा लागतो. या चित्रपटासाठी मी खूप गोष्टींचा विचार करत ते अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी या चित्रपटातून त्या घटनेचं नाटय़ पडद्यावर उतरवण्यासाठी खूप तांत्रिक प्रयोग केले आहेत’’, अशी माहितीही त्याने दिली. वैमानिकाची मुख्य भूमिका करणं हेही तेवढं सोप्पं नाही. घटनेनुसार तसे प्रसंग घडतात, मग तसे संवाद, अभिनय या सगळय़ाचाच मिलाफ चित्रपटात असावा लागतो. वास्तवात मुळात वैमानिकाचं काम सोपं नाही, त्याला कुठल्या क्षणी कोणत्या नैसर्गिक वा अन्य प्रसंगांना तोंड द्यावं लागेल याची काही कल्पना नसते. त्यामुळे एक वैमानिक अशा परिस्थितीत कसा वागेल, यासाठीही भूमिकेचा खूप अभ्यास करावा लागला असं त्याने सांगितलं.

कचरायचे का?

हॉलीवूडपासून अनेक देशांत चित्रपटांतून छोटीशी भूमिका साकारत आपला बाज ठळक करण्याचा यशस्वी प्रयत्न कितीतरी कलाकारांनी केला आहे. आपल्याकडे मात्र कलाकार यासाठी  कचरतात याबद्दल मला आश्चर्य वाटतं. एक छोटी भूमिका जर संपूर्ण चित्रपटावर भारी पडणार असेल तर का नाही ती भूमिका करायची, असाही प्रश्न मला पडतो, असं सांगतानाच हिंदी चित्रपटसृष्टीतही अशा पद्धतीने काम व्हायला हवं अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्टारडम असे काहीच मी मानत नाही. काहींकडे तो ‘एक्स फॅक्टर’ असतो, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी आत्ता आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माझ्या यशाकडेही पाहून अनेकांनी असे प्रश्न विचारले आहेत की तुमच्या यशामागील रहस्य काय वगैरे.. परंतु मी नेहमी हेच उत्तर देतो की मी काही ‘मेथड अ‍ॅक्टर’ नाही. काही जण त्यातही हुशार असतात, पण मी किंवा माझी पत्नी काजोलही उत्स्फूर्त अभिनयावर जोर देतो. आम्हाला तिथल्या तिथे अभिनय समजून तो पडद्यावर उतरवायला आवडतं. तर काहींना तालिमीद्वारे त्याची तयारी करावीशी वाटते. आम्ही उत्स्फूर्त अभिनयातही सातत्य ठेवलं आहे हेच आमच्या यशाचं रहस्य आहे.

दिग्दर्शक म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिनय करून घ्यावा लागत नाही. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक म्हणून काम करणं हाही तितकाच आनंददायी अनुभव असतो. मुळात ते दिग्दर्शकाच्या विचारानुसार काम करणारे अभिनेते आहेत. त्यामुळे तिथेही अडचण येत नाही. ते त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला मोकळेपणाने वागवतात. चित्रीकरणाच्यावेळीही ते नेहमी एक तासभर आधीच येतात आणि चित्रीकरण संपलं की दुसऱ्या दिवशीच्या कामाची तयारी करतात. 

अजय देवगण