बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर ती निशाणा साधत असते. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर कंगनाने टीका केली आहे. या चित्रपटाबाबत कंगनाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा खरपूस समाचार घेत त्याला हुशार म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : ‘पुष्पा २’मध्ये लागली ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनबरोबर

कंगना रणौतने करण जोहर आणि आलिया भट्ट-रणबीर कपूरवरही टीका केली. ब्रह्मास्त्रला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्यावर कंगनाने चित्रपट निर्मात्यावर खोट्या गोष्टी विकण्याचा आरोप केला. इन्स्टाग्रामवर तिने स्टोरीजच्या माध्यमातून ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या नकारात्मक प्रतिक्रियांचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आणि लिहिले, “जेव्हा तुम्ही खोटे दाखवण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे होते. करण जोहर लोकांना प्रत्येक शोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीरला सर्वोत्कृष्ट कलाकार आणि अयान मुखर्जीला प्रतिभावान म्हणायला भाग पाडतो. अयानचा हळूहळू या खोट्यावर विश्वास बसू लागला आहे.”

पुढे दुसऱ्या स्टोरीत तिने लिहिले, “यावरून हे सिद्ध होतं की, ६००  कोटी अशा चित्रपटावर खर्च केले आहेत ज्याच्या दिग्दर्शकाने आपल्या आयुष्यात कधीच चांगला चित्रपट बनवला नाही. त्याने हा चित्रपट बनविण्यासाठी १२ वर्षे घालवली, ४०० दिवस शूटिंग केले, त्यात १४ डीओपी आणि ८५ सहाय्यक दिग्दर्शक बदलले. ६०० कोटींची त्याने राख केली आहे. या चित्रपटावर पैसे गुंतवण्यासाठी भारतातील फॉक्स स्टुडिओला स्वत:ला विकावे लागले आणि अजून किती स्टुडिओ या जोकरमुळे किती बंद होणार आहेत?”

रणबीर आणि अलियाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी शेअर केली. त्या मुद्द्यावरूनही कंगनाने त्यांच्यावर टीका केली आहे. त्यासोबतच केआरकेच्या अटकेसाठी तिने बॉलिवूडमध्ये ‘गटबाजी’ असल्याचा आरोप केला. ती म्हणाली, “बेबी पीआरपासून लग्नापर्यंत मीडियावर नियंत्रण ठेवले, केआरकेला तुरुंगात टाकले, रिव्ह्यू विकत घेतले, तिकिटे विकत घेतली. ते सर्व बेईमानी करू शकतात पण एक चांगला प्रामाणिक चित्रपट बनवू शकत नाहीत. अयान मुखर्जीला जे हुशार म्हणतात त्यांना ताबडतोब तुरुंगात पाठवले पाहिजे. ६०० कोटी जळून खाक झाले, धार्मिक भावना दुखावण्याचाही प्रयत्न झाला.”

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ चा संदर्भ देत ती म्हणाली, “करण जोहरसारख्या लोकांची त्यांच्या वागणुकीबद्दल चौकशी केली पाहिजे. त्याला त्याच्या चित्रपटांच्या स्क्रिप्टपेक्षा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त रस असतो. तो वादग्रस्त खुलाशांसाठी ओळखला जातो.” ती पुढे म्हणाली, “मुव्ही माफियाने सर्वकाही दूषित करून ठेवले आहे. तो स्वतः रिव्ह्यू खरेदी करतो, बनावट कलेक्शन दाखवतो आणि तिकिटे खरेदी करतो. यावेळी त्यांनी हिंदू धर्म आणि दक्षिणेच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला. अचानक तो पुजारी बनला आणि त्याने दक्षिणेतील अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शकांना त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विनवणी केली. तो सर्वकाही करेल, परंतु सक्षम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि टॅलेंटेड लोकांना काम देणार नाही.”

आणखी वाचा : “स्वतः धर्मांतर केलेल्याने विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्वं करू नये,” कंगनाने पुन्हा साधला महेश भट्ट यांच्यावर निशाणा

या वर्षाच्या सुरुवातीला कंगनाने आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत “या चित्रपटाची सर्वात मोठी चूक म्हणजे ‘चुकीचे कास्टिंग’” असे लिहिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आलिया आणि तिच्या चित्रपटावर निशाणा साधला.