शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शाहरुख खान आणि गौरी खानच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. मूळचे दोघे दिल्लीचे, दिल्लीत दोघांचे प्रेमप्रकरण जमले मात्र शाहरुखला बॉलीवूडमध्ये नाव कमवायचं होत त्यासाठी तो मुंबईला आला, सुरवातीला मालिकानंतर चित्रपटात त्याला काम मिळू लागले. प्रेमात बरेच चढ-उतार पहिल्यानंतर १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं आणि आता हे तीन मुलांचे आई- वडील आहेत.आजही गौरी खान शाहरुखच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

गौरी खानदेखील एक व्यावसायिक आहे. कार्यक्रमांमध्ये ती उपस्थित असते. नुकतीच एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली ‘यंदाची दिवाळी कुटुंबाबासोबत साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. गेली दोन वर्ष करोना महामारीत गेल्यामुळे दिवाळी साजरी करता आली नाही. एखादी व्यक्ती नेहमी कुटुंबासोबत एकत्र राहण्याची आणि सण-उत्सवात एकत्र साजरी करण्यास उत्सुक असते. ती पुढे असं म्हणाली की, दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, भरपूर मिठाई खाणे, थोडे वजन वाढवणे आणि घरी पत्ते खेळणे आणि कुटुंबासोबत राहणे आणि घर सजवणे यासाठी मी उत्सुक आहे’.

करोना काळात ‘गौरी’ एकमेव…, शाहरुखने पत्नीबद्दल व्यक्त केल्या भावना

शाहरुख, गौरी मागच्या वर्षी हा सण साजरा करू शकले नाहीत कारण त्यांचा मुलगा आर्यन अटकेत आणि तुरुंगात होता. अंमली पदार्थाशी संबंधित एका प्रकरणात त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. नंतर तपासानंतर एनसीबीने त्याला क्लीन चिट दिली होती. गौरीला तिच्या यंदाच्या दिवाळीच्या प्लॅन्सबद्दल विचारले असता ती म्हणाली की दिवाळीची तयारी अजून सुरु झालेली नाही. तिने पुढे सांगितले की ती घराची सजावट करणार आहे आणि बरेच दिवे लावणार आहे. या वर्षीच्या दिवाळीची ती खरोखरच आतुरतेने वाट पाहत असल्याचे तिने शेवटी सांगितले.

गौरी खानचा इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय आहे. तिने करण जोहरची टेरेस तसेच यश आणि रुहीची नर्सरी डिझाइन केली आहे. तिने रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलीन फर्नांडिस या लोकप्रिय कलाकारांच्या घराचे इंटिरियर्स केले आहे. तसेच ती निर्मिती क्षेत्रात देखील कार्यरत आहे.