शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला ‘हॅपी न्यू इयर’ हा फराह खान दिग्दर्शित चित्रपट रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत असल्याने सगळीकडे कौतुकाचे बोल उधळले जात आहेत. मात्र, चित्रपटाची ही खोटी स्तुती जया बच्चन यांना अजिबात रुचलेली नाही. ‘हॅपी न्यू इयर’मध्ये अभिषेक बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तरीही जया बच्चन यांनी कुठलीही भीड न बाळगता चित्रपटाचे जाहीर वाभाडे काढले आहेत. ‘हॅपी न्यू इयर’ हा मी पाहिलेल्या चित्रपटांमधील सगळ्यात वाईट आणि अर्थहीन चित्रपट आहे, असे जया बच्चन यांनी म्हटले आहे. 

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना जया बच्चन यांनी या चित्रपटाविषयी उघड टीका केली. वास्तविक ‘हॅपी न्यू इयर’ अभिषेकच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा होता. गुणवत्ता असूनही यश मिळत नसल्याने अभिषेकच्या वाटय़ाला फारसे चांगले चित्रपट आलेले नाहीत. गेल्यावर्षीचा ‘धूम ३’ आणि आत्ता शाहरूखबरोबर ‘हॅपी न्यू इयर’ वगळता अभिषेकच्या चित्रपटांचा बोलबालाही नाही. या चित्रपटात अभिषेकने नंदू भेंडे नावाच्या मराठी तरुणाची व्यक्तिरेखा साकारली असून त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले आहे. कधी नव्हे ते शाहरूख आणि दीपिकापेक्षाही चित्रपटात अभिषेकचे काम लोकांना जास्त आवडल्याने त्याचीच चर्चा होते आहे. केवळ अभिषेक या चित्रपटात काम करत असल्यानेच आपण हा चित्रपट पाहिला. नाहीतर आपण कधीही असल्या निर्थक चित्रपटांच्या वाटय़ाला जात नाही, असेही जया बच्चन यांनी सांगितले.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी न्यू इयर’ने आतापर्यंत ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे. आणि अजूनही चित्रपट सर्वत्र जोरदार चालतो आहे. मात्र, काहीही असले तरी या चित्रपटाला काहीही अर्थ नाही, असे जया बच्चन यांचे ठाम मत आहे. असल्या निर्थक चित्रपटांमुळेच गेल्या काही वर्षांमध्ये आपण चित्रपटात काम करणेच सोडून दिले असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. जरा कुठे आपल्या वाटय़ाला आलेल्या कौतुकामुळे अभिषेकच्या अंगावर मुठभर मांस चढले असलेच तर आईने केलेल्या या जाहीर ‘कौतुका’मुळे आता फराह खानशी असलेले मित्रत्वाचे नातेही तुटायचे या भीतीने तेही उतरले असेल.