|| रेश्मा राईकवार नायक -नायिका आणि त्यांच्या कथेत विघ्न आणू पाहणारा खलनायक. मग खलनायकाला अद्दल घडवून प्रेम जिंकणारा नायक हा ढोबळ प्रेमकथेचा साचा कधीच मागे पडला. एक फूल दो माळी अशा पध्दतीच्या प्रेमकथाही येऊन गेल्या. हल्लीच्या ट्रेण्डप्रमाणे दोघींमध्ये अडकलेला नायक मागे पडून दोघांच्या प्रेमात अडकलेली किंवा गोंधळलेली नायिका समोर येऊ लागली आहे. नितीन कांबळी दिग्दर्शित ‘कॉफी’ या चित्रपटात नायिकेच्या गोंधळलेल्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळते. प्रेमाचे गोडीगुलाबीचे चार दिवस सरतात आणि मग एकेकाळी प्रेमीयुगुल म्हणून ओळखले जाणारे दोन जीव पती-पत्नी म्हणून संसाराची दोन चाकं सांभाळायला लागतात. मग त्यात आर्थिक स्थैर्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कधी प्रेमापेक्षा नैया सांभाळण्यात एक गुंतला की दुसरा एकटा पडतो. म्हणजेच दोघांचे प्रेम कमी होते का? या प्रश्नाचं उत्तर तसं व्यक्तिसापेक्षच आहे. तरीही इथे या चित्रपटात अशाच एका अस्वस्थ वळणावर रेणुकाला (स्पृहा जोशी) कामानिमित्त महिनाभर गोव्याला जावं लागतं. बायको महिनाभर भेटणार नाही म्हणून अस्वस्थ होणारा नवरा दाखवल्याबद्दलही दिग्दर्शकाचं कौतुकच करायला हवं. नाहीतर इथेही बायको गेली माहेरी, काम करी. हे वळण देणं जास्त सोपं जातं. तर गोव्यात पोहोचल्यावर सौ. रेणुका म्हणून वावरणाऱ्या नायिकेला हसरा, खेळकर, पहिल्याच भेटीत मने जिंकून घेणारा रोहित (सिध्दार्थ चांदेकर) भेटतो. कामानिमित्त एकत्र आलेल्या या दोघांमध्ये घट्ट मैत्री होते आणि गोव्याच्या मुक्त वातावरणात ही मैत्री बहरते. मैत्री आणि प्रेमातली अस्पष्ट रेषाही पार होते, अर्थात मनाच्या पातळीवर. मात्र दुसऱ्या नात्याबद्दल निर्णय घेण्याआधी रेणुका घरी नवऱ्याकडे परतते. आणि कॉफीचे कप घेऊन त्यांच्यात नेमकं काय बिनसलं आहे याची चर्चा सुरू होते. नेहमीच्या प्रेमकथांपेक्षा निश्चितच वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी केला आहे. र्मंच्छद्र बुगडेंनी लिहिलेली ही कथा नेहमीपेक्षा वेगळ्या कल्पनेभोवती गुंफण्यात आली असली तरी ती लिहिताना काहीसे ठोकळेबाज फंडे घेऊनच पुढे जाते. नायिकेच्या मनातलं प्रेम की लग्न हे द्वंद्व लेखक झ्र दिग्दर्शक या जोडीने ‘कॉफी’मधून मांडलं आहे हे खरं आहे. मात्र त्याबाबतीत अंतिम निर्णय घेताना नायिकेचं जे गोंधळलेपण आहे ते त्याच बुरसटलेल्या विचारांतून येताना दिसतं. विवाहित स्त्री असल्याने प्रेमात पडण्याचा आपल्याला अधिकार नाही, हा पहिला अडकवणारा विचार. आपण रोहितकडे ओढले जात आहोत हे लक्षात येऊनही नायिका पुढचं पाऊल उचलते, मात्र मनाच्या ओढीची वेस ओलांडून शारीर प्रेमात गुंतणार याची जाणीव होताच तिच्यातील पत्नी तिला थांबवते. अर्थात हा प्रसंग पत्नीच्याच तोंडून ऐकताना नवऱ्याच्या रणजीतच्या (कश्यप परुळेकर) चेहऱ्यावरचं विजयी हसूही कॅमेरा अचूक टिपतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या नात्यात काहीएक विसंगती निर्माण झाली आहे. ती स्वीकारून ते नातं पुढे न्यायचं की नव्या प्रेमाचा स्वीकार करायचा, हा निर्णय नायिका एकट्याने घेऊ शकत नाही. त्यासाठी ती नवऱ्याकडे परतते. या सगळ्या प्रक्रियेत अजूनही स्त्रीच्या मनात नवरा-लग्न याबद्दल असलेल्या चौकटीतील विचारांचा पगडा लेखक-दिग्दर्शकाला दाखवून द्यायचा नसला तरी नकळतपणे तो प्रर्तिंबबित झाला आहे. चित्रपटातील तिन्ही कलाकारांनी आपापल्या पध्दतीने चित्रपट तोलून धरला आहे. रोहितच्या भूमिकेसाठी सिध्दार्थची निवड एकदम चपखल ठरली आहे, किंबहुना सिध्दार्थ आता अशा भूमिकांमध्ये सरावला आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कश्यप परुळेकरने संयमी रणजीतची भूमिका सहजतेने साकारली आहे. तर स्पृहाने नेहमीच्या सहजशैलीत रेणुकाच्या मनातील द्वंद्व साकारलं आहे. एक सशक्त व्यक्तिरेखा पेलण्याची ताकद असलेली अभिनेत्री असतानाही रेणुकाच्या व्यक्तिरेखेला तथाकथित मर्यादा-ठोकताळ्यांपलीकडे नेण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही. प्रेमकथेसाठी आवश्यक असलेल्या सुमधुर संगीताचीही चित्रपटात वानवा आहे. आणि गोव्याची पाश्र्वभूमी असतानाही तिथली काही ठरावीक प्रसिध्द ठिकाणांची दृश्ये घेऊन त्याचा कोलाज साधण्यापलीकडे कॅमेरा फारसा काही कमाल दाखवत नाही. नायिकेला मशीनची नाही तर हाताने बनवलेली कॉफी आवडते. आणि कॉफीचे घुटके घेत रंगवलेला हा प्रेमत्रिकोण शेवटी नैतिकतेचे परिमाण लावून सोडवला जातो. एका स्त्रीच्या मनातील प्रेमाचा गोंधळ संपवण्यासाठी दोन्ही पुरुषांना आपापल्या परीने पुढाकार घ्यावा लागतो, अशी काहीशी विचित्र आणि कडवट चव ही प्रेमाची ‘कॉफी’ देऊन जाते. कॉफी दिग्दर्शक झ्र नितीन कांबळे कलाकार झ्र स्पृहा जोशी, सिध्दार्थ चांदेकर, कश्यप परुळेकर, मोहन जोशी.