बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण करण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आलेला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीनेही अशाचप्रकारे संघर्ष केला. अर्शदने सिनेसृष्टीत त्याची २५ वर्ष पूर्ण केली आहे. यानंतर त्याने त्याच्या करिअरबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. बॉलिवूडमध्ये २५ वर्षांचा इतका मोठा अवधी घालवल्यानंतर अजूनही तो कामाच्या शोधात आहे, असे वक्तव्य त्याने केले आहे. अर्शदने नुकतंच हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते चित्रपट कारकिर्दीबद्दल अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. सिनेसृष्टीत २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अर्शद म्हणाला की, "मला अजूनही विश्वास बसत नाही की मी सिनेसृष्टीत इतकी वर्षे टिकू शकेन. मी २५ वर्षे पूर्ण केल्याचा मला आनंद आहे. पण त्यासोबत मला धक्काही बसला." "मी २५ वर्षे सिनेसृष्टीत टिकेन असे मला अजिबात वाटले नव्हते. माझे इतर सहकारी कलाकार एकामागून एक यातून बाहेर पडत असल्याचे पाहून मला फार भीती वाटायची. मला अनेकदा वाटायचं की आता पुढचा नंबर माझा आहे. मी यात पदार्पण करत असताना फार घाबरलो होतो. यापूर्वी मी कधीही अभिनय केला नव्हता. मला चित्रपट करायला खूप भीती वाटत होती. विशेष म्हणजे कुठलाही चित्रपट न करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर मी त्या अशा लोकांमधील आहे, ज्याने या इंडस्ट्रीतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. कारण मला अपयशाची फार भीती वाटत होती." असेही त्याने म्हटले. "अपयश येईल अशी सारखी भीती मला वाटत होती. पण जर आता मागे फिरलो तर सगळे म्हणतील हा इथे अभिनेता बनण्यासाठी आला आहे. एखाद्या वाईट काळातून जाण्यापासून ते न थांबता काम करण्यापर्यंत सर्वांचा अनुभव मी घेतला. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. मला असे वाटते की माझ्यापुढे आणखी एक लांब प्रवास आहे. मला इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तरीही अजूनही मी नोकरीच्या शोधात आहे." असेही तो म्हणाला. हेही वाचा : ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी! तीन वर्षे आपल्याच क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या कामाव्यतिरिक्त दिवस काढलेल्या या अभिनेत्याच्या म्हणजेच अर्शद वारसीच्या कारकिर्दीला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील भूमिकेने कलाटणी दिली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अर्शदने साकारलेली ‘सर्किट’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकून गेली. मुन्नाभाई आणि सर्किटच्या धम्माल केमिस्ट्रीला प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली होती. आपल्या करिअरच्या सुरूवातीला अतिशय चाचपडत सुरूवात करणाऱ्या अर्शद वारसीने आपली स्वत:ची एक वेगळी एक ओळख बनवली आहे.