अभिनेत्री कंगना राणौतने भारताला १९४७ साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, अशा आशयाचे विधान केले होते. कंगनाच्या या विधानावरून देशभर वादंग माजला असताना विक्रम गोखले यांनी पुण्यात झालेल्या समारंभात कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे, असे सांगत तिला समर्थन दिले. विक्रम गोखले यांनी कंगनाला समर्थन करताच त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. दरम्यान, एका मराठमोळ्या निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखले यांच्यासोबत काम करणार नाही असे जाहिर केले आहे. 'शाळा', 'फँड्री' अशा गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते निलेश नवलाखा यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना राणौत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो' असे ट्वीट निलेश यांनी केले आहे.आणखी वाचा : मैत्री, प्रेम, लग्न ते कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; अशी सुरु झाली होती अनिकेत विश्वासराव आणि स्नेहाची लव्हस्टोरी “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली. नेमकं प्रकरण काय? ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. गोखले म्हणाले काय?रविवारी ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्दय़ांवर भाष्य केले. कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केले. स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या योद्धय़ांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिपणीही त्यांनी केली.