अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. मोदीजी किती समजावत आहेत पण यांना कळत नाही. देशाला आता धर्माची गरज आहे असं ती म्हणाली. तिच्या या कॉमेंटवर गायक जसबीर जस्सी याने संताप व्यक्त केला आहे. चमचेगीरी करण्याची देखील हद्द असते असा टोला त्याने कंगनाला लगावला आहे.

“मोदीजी किती सांगतायेत पण यांना कळत नाही. शाहीन बागमध्ये दंगल उसळवणाऱ्यांना माहित होतं की त्यांची नागरिकता कोणी हिसकवणार नाही. तरी देखील त्यांनी दंगळी उसळवल्या आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर पुरस्कार पटकावले. या देशाला आज धर्म आणि नैतिक मुल्यांची गरज आहे.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. तिच्या या ट्विटवर जसबीर संतापला आहे.

“मुंबई महानगरपालिकेने एक चबुतरा तोडला होता तेव्हा जग डोक्यावर घेतलं होतस. अन् आता शेतकऱ्याची आई त्याची जमीन संकटात आहे तर त्यांचा विरोध करतेय. पाठिंबा देण्याची हिंमत नसेल तर किमान विरोध तरी करु नकोस. चमचेगीरी आणि बेशर्मीची देखील एक हद्द असते.” अशा आशयाचं ट्विट करुन जसबीरने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.