कमल हासन हे नाव आता कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेले नाही. केवळ कलाविश्वच नाही तर राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळते. ते बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील तितकेच लोकप्रिय आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ‘सदमा’,’चाची 420′ असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी आपल्या प्रयोगशील अभिनयाने एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. कमल हासन यांचा आगामी विक्रम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत कमल हासन यांनी दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी सिनेसृष्टी या वादावर भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी सिनेसृष्टी असा वाद सुरु आहे. आरआरआर, पुष्पा, केजीएफ चॅप्टर २ यासारखे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड चित्रपट हे फ्लॉप झाले आहेत. यामुळे सध्या सिनेसृष्टीत दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी सिनेसृष्टी असे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतंच यावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रम या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी कमल हासन म्हणाले, “भारतात सर्व भाषिक चित्रपटांची निर्मिती पहिल्यापासूनच होत आहे. ‘पडोसन’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला होता. तसेच ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपटदेखील सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आपला देश अद्वितीय आहे. आपण वेगवेगळ्या भाषा बोलत असलो तरीही आम्ही एक आहोत. हेच या देशाचे सौंदर्य आहे.”

“आम्ही नेहमीच सर्वत्र प्रदर्शित होत असलेले चित्रपट बनवत आलो आहोत. आपला चित्रपट किती चांगला आहे, यावर तो आवडेल की नाही हे अवलंबून आहे. Chemmai एक मल्याळम चित्रपट आहे. तो सर्वत्र प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट डबही करण्यात आला नव्हता. त्याला उपशीर्षकेही नव्हती. पण तरीही लोकांनी त्याचा आनंद लुटला होता”, असेही कमल हासन म्हणाले.

“अरे माणूस आहेस का भूत”, दिलीप प्रभावळकरांना बाळासाहेब ठाकरे असं का म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

कमल हासनच्या यांचा‘विक्रम’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहद फासिल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.