चित्रपटच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवणारे अभिनेते कमल हासन हे मनोरंजनसृष्टीतील एक मोठं नाव आहे. कमल हासन हे त्यांचे राजकीय विचार, बाजू निर्भीडपणे मांडत असतात, बऱ्याचदा यामुळे त्यांच्यावर टीकादेखील होते. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांचा चित्रपट ‘हे राम’बद्दल खुलासा केला आहे. हा चित्रपट केवळ गांधीजींची माफी मागण्यासाठी काढला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युट्यूब चॅनलवर नुकताच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे महान नट कमल हासन यांच्याशी संवाद साधत आहेत. चित्रपट, राजकारण, टीका या सगळ्या गोष्टींवर या दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आणखी वाचा : जेव्हा पैशांवरून घासाघिस करणाऱ्या अशनीर ग्रोव्हरला सलमानच्या मॅनेजरने फटकारलं; म्हणाला “तू भाजी विकत…”

मुलाखतीदरम्यान कमल हासन यांनी गांधीजींबद्दलचे त्यांचे विचार कसे बदलले हे स्पष्ट केलं आहे. शिवाय भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्या गेलेल्या आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हे राम’ या चित्रपटामागे नेमका काय विचार होता हेसुद्धा कमल यांनी उलगडून सांगितलं आहे. या चित्रपटात कमल हासन यांच्याबरोबर शाहरुख खान, राणी मुखर्जी, सौरभ शूक्ला, अतुल कुलकर्णी, शरद पोंक्षे यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

याविषयी बोलताना कमल म्हणाले, “आज मी गांधीजींविषयी भरभरून बोलतो, पण मी सुरुवातीपासूनच असा नव्हतो. माझे वडील कॉँग्रेसचे कार्यकर्ते होते पण माझ्या सभोवतालचं वातावरण पाहता मी माझ्या तरुणपणात गांधीजींचा टीकाकार होतो. मी केवळ आजचा विचार करायचो. त्यावेळी मला माझे वडील सांगायचे कि इतिहास समजून घे, यावरून त्यांनी माझ्याशी कधीच वाद घातला नाही.”

कमल हासन हे गांधीजींचे प्रशंसक कधी झाले याविषयी बोलताना ते म्हणाले, “मी २४ का २५ वर्षांचा होतो तेव्हा मी स्वतः गांधीजी हे रसायन नेमकं काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि कालांतराने मी त्यांच्या कार्याचा समर्थक झालो, चाहता झालो. खरंतर स्वतःचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि गांधीजींची माफी मागण्यासाठी मी ‘हे राम’ हा चित्रपट काढला. या चित्रपटात मीसुद्धा एका मारेकऱ्याची भूमिका साकारली ज्याला गांधीजींना मारायचं असतं, पण जसजसा तो त्या व्यक्तीच्या जवळ जातो तसतसे त्याचे विचार बदलतात आणि सत्य समोर येतं, पण अर्थात तोवर वेळ निघून गेलेली असते कुणी दुसऱ्या व्यक्तीने त्या महात्म्याला मारलेलं असतं.”

याबद्दल राहुल गांधी यांनी कमल हासन यांना विचारलं की “ही संकल्पना तुमची होती?” यावर कमल हासन उत्तरले, “होय ही माझीच संकल्पना होती. या चित्रपटातून मी माझ्या बापूंची माफी मागितली.” हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट तामीळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रीत करून सादर करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan tells rahul gandhi in a conversation why he made film like hey ram avn
First published on: 02-01-2023 at 14:24 IST