बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेलं नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आलेली कंगना आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी मनाली येथे जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे मुंबई सोडताना कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

“मी अत्यंत जड अंत:करणानं मुंबईचा निरोप घेत आहे. माझी निंदा नालस्ती केली गेली, ऑफिसपाठोपाठ माझं घर तोडण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षारक्षकांचा पहारा माझ्याभोवती ठेवावा लागला. ज्याप्रकारे मला दहशत दाखवण्यात आली ते बघता पाकव्याप्त काश्मीरची तुलना वर्मी लागली असंच म्हणावं लागेल.” मुंबई सोडताना कंगनाने अशा आशयाचं ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे तिने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा- व्यापाऱ्यांचा कंगनाला असाही पाठिंबा; बाजारात आणली ‘कंगना साडी’

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.