सोमवारची सकाळ ही भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णसकाळ ठरली आहे. ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब जिंकून भारताची हरनाझ संधू विश्वसुंदरी बनली आहे. जवळपास २१ वर्षांनंतर तिने भारताला हा ताज मिळवून दिला आहे. याआधी २००० साली अभिनेत्री लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. आता चंदीगढच्या हरनाझने हा ताज जिंकताच तिच्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, कंगना रणौतने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. आता हरनाझने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकल्यानंतर कंगनाने पोस्ट केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हरनाझचा फोटो शेअर करत ‘खरंच ही आनंदाची बातमी आहे. अभिनंद हरनाझ संधू’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘कभी खुशी कभी गम’मध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानने केले आहे काम, तुम्ही ओळखलं का?

कंगनासोबतच इतरही बॉलिवूड अभिनेत्रींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हरनाझला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सर्वच भारतीयांसाठी आनंदाचा क्षण ठरला आहे.

कोण आहे हरनाझ संधू?
चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.