चित्रपटसृष्टीत कलाकारांमध्ये बऱ्याचदा मतभेद पाहायला मिळतात. गेल्या वर्षभरापासून चर्चेत राहिलेला विषय म्हणजे करण जोहर आणि काजोलमध्ये असलेला वाद. गेल्या अनेक दिवसांपासून करण आणि काजोलच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. करणने त्याच्या ‘अॅन अनसूटेबल बॉय’ या आत्मचरित्रात काजोलसोबत असलेल्या २५ वर्षांची मैत्री संपल्याचे म्हटले होते. मात्र या दोघांमधील वाद आता निवळला आहे.

करणने काजोलच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन मैत्रीतील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. तर काजोलनेही करणच्या मुलांचा पहिला फोटो लाइक करत दोघांमधील कडवटपणा कमी झाल्याचं स्पष्ट केलं. या वादाचा मुद्दा पुन्हा काढण्याचं कारण म्हणजे करण जोहरने शाहरुखच्या ‘टेड टॉक्स’ या शोमध्ये काजोलसाठी एक विशेष चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्याने आत्मचरित्रात काजोलबद्दल लिहिलेल्या कठोर शब्दांसाठी पश्चाताप व्यक्त केला.

वाचा : बाबा राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर शाहरुखने व्यक्त केला आनंद

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘टेड टॉक्स’च्या या एपिसोडची थीम ‘चेंजिंग रिलेशनशिप’ असं होतं, ज्यामध्ये सेलिब्रिटी पाहुण्याला बोलून किंवा लिहून आपल्या भावना व्यक्त करण्याचा पर्याय दिलेला. यावेळी करणने काजोलसाठी चिठ्ठी लिहिली. ‘काजोल अजूनही माझी जवळची मैत्रीण आहे आणि २५ वर्षांची ही मैत्री माझ्यासाठी खूप विशेष आहे,’ असं त्याने या चिठ्ठीत लिहिलं होतं.

PHOTOS : बहिण अहानाची इशा देओलला ‘सरप्राइज’ बेबी शॉवर पार्टी

करणने त्याच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे लिहिलेलं की, ‘आता सर्व संपले आहे. ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. तिलाही हेच हवे आहे असं मला वाटतं. एका वेळी ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, पण तिने माझ्या २५ वर्षाच्या भावनांकडे पाठ फिरवली.’