कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं आहे. चित्रपटामुळे सुरू असलेला वाद टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा होताच त्याच्या नावावरून वाद सुरू झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला हिंदुत्वविरोधी म्हटलं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक आर्यननं चित्रपटाच्या नव्या नावाची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे. यासोबतच त्याने चित्रपटातील स्वतःचा आणि कियारा अडवाणीचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटात कार्तिक आर्यन ‘सत्यप्रेम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे, तर कियारा अडवाणी ‘कथा’ नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. रविवारी कियारा अडवाणीचा वाढदिवस होता. या निमित्ताने कार्तिक आर्यनने अभिनेत्रीला शुभेच्छा देत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक आणि कियारा एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना कार्टिन आर्यनने कॅप्शनमध्ये लिहिलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा कथा! तुझा सत्यप्रेम.’ कार्तिकने हॅशटॅगमध्ये रेड हार्ट इमोजीसह चित्रपटाचे नाव उघड केले आहे. चित्रपटाचं नाव बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ करण्यात आल्याचा खुलासा त्याने केला आहे.

मागच्या वर्षी जुलैमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ट्वीट करून चित्रपटाचे नाव बदलले जाणार असल्याची माहिती दिली होती. वर्षभरापूर्वी मध्यप्रदेशातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाच्या नावाला विरोध केला होता. चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला यांनी चित्रपटाचं असं नाव ठेवून हिंदू देव-देवतांचा अपमान केला आहे, असा दावा त्यांनी केला होता. एवढंच नाही तर चित्रपटाचं नाव बदललं गेलं नाही आणि साजिद नाडियादवाला कधी भोपाळला आले तर त्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल, असा इशारा या संघटनांनी दिला होता.

आणखी वाचा- कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये होती सारा अली खान, अमृता सिंग ठरल्या ब्रेकअपचं कारण?

दरम्यान चित्रपटाला होणारा विरोध आणि वाढता वाद पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ट्वीट करून यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी लिहिलं होतं, ‘कोणत्याही चित्रपटाचे खूप विचार करून ठरवलं जातं. यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. तसेच भविष्यातही यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून आम्ही ‘सत्यनारायण की कथा’ हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.’ याशिवाय आपल्या ट्वीटमध्ये समीर विद्वांसन यांनी, चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला आणि क्रिएटिव्ह टीमचाही या निर्णयाला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं.

‘सत्यप्रेम की कथा’ हा कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा एकत्र दुसरा चित्रपट असेल. अलिकडेच रिलीज झालेल्या ‘भूल भुलैय्या २’मध्ये दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. ‘भूल भुलैय्या २’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपट आहे. याने बॉक्स ऑफिसवर १८१.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aryan kiara advani new film satyanarayan ki katha change the name as satyaprem ki katha mrj
First published on: 01-08-2022 at 14:47 IST