जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील बलात्कार प्रकरणामुळे सध्या देशात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. आठ वर्षांच्या चिमुरडीवर गावातील मंदिरामध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण देशातून पुन्हा एकदा मानवता कुठेतरी हरवत चालल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. यामध्ये अनेकांच्या संतापाने परिसीमा ओलांडल्याचंही पाहायला मिळालं. पोलीस तक्रारीमध्ये म्हटल्यानुसार त्या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर सर्वच माध्यमांतून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. विविध विषयांवर आपली ठाम मतं मांडणाऱ्या अभिनेता फरहान अख्तर यानेही ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. फरहानने या संपूर्ण घटनेविषयी ट्विट करत लिहिलं, 'सलग काही दिवसांसाठी बंदी ठेवलेल्या, सतत नशेचे पदार्थ दिलेल्या, वारंवार बलात्कार केलेल्या आणि त्यानंतर हत्या केलेल्या त्या मुलीच्या मनात त्यावेळी नेमकं काय चाललं असेल याचा विचार करा. तिच्यासोबत झालेल्या त्या प्रसंगाविषयी तुमच्या मनात घृणा निर्माण होत नाही. हे दहशतवादी कृत्यं आहे असं तुम्हाला वाटत नाही तर तुमच्या मानवजातीवर धिक्कार असो. पीडितेला न्याय मिळो असं तुम्हाला वाटत नसेल तर तुमच्या अस्तित्वाचा काहीच फायदा नाही.' वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र फरहानच्या या ट्विटला सोशल मीडियावर अनेकांनीच लाइक केलं असून, अभिनेता रितेश देशमुखनेही हे ट्विट रिट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटमधून तिच्याप्रती (पीडितेप्रती) त्याची हळहळ आणि बलात्कार करणाऱ्यांसाठी त्याच्या मनात असणारा संताप बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं. देशात बलात्कार, अपहरण या सर्व कृत्यांचं वाढतं प्रमाण पाहता ही चिंतेची बाब असल्याचंच जनसामान्यांचंही मत आहे.