'कौन बनेगा करोडपति' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय क्विज शो आहे. हा शो अगदी सुरू झाल्यापासूनच कायम चर्चेत आलाय. एकेकाळी 'कौन बनेगा करोडपति' सीजन ५ मधला विजेता सुशील कुमार सुद्दा बराच चर्चेत आला होता. तो बिहारमधल्या एका मध्यमवर्गीय कुटूंबातून होता. ज्यावेळी सुशील कुमारने 'कौन बनेगा करोडपति' सीजन ५ मधून पाच कोटी जिंकले, त्यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. अनेकदा कोणत्याही शोमधून एखादा विजेता म्हणून बाहेर पडतो, त्यानंतर तो एक ऐशोआराम आयुष्य जगणार असाच अंदाज लावला जातो. परंतू 'कौन बनेगा करोडपति' सीजन ५ मधील विजेता सुशील कुमार याच्याबाबतीत मात्र सारं उलटं घडलं. गेल्याच वर्षी त्याने एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यात सुरू असलेल्या कठीण परिस्थितीबाबत भावना व्यक्त केल्या. 'कौन बनेगा करोडपति' सीजन ५ मध्ये जिंकल्यानंतर त्याचं आयुष्य अक्षरशः नरकासारखं झालं असल्याचं त्याने या पोस्टच्या माध्यमातून शेअर केलं. आपल्याच माणसांकडून मिळत होता विश्वासघात सुशील कुमारने त्याच्या आयुष्यातील आवानात्मक परिस्थितीबाबत भावना व्यक्त करताना म्हणाला, "कौन बनेगा करोडपति शोमधून पाच कोटी जिंकून आल्यानंतर प्रत्येक दिवशी मला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जात होतं. या दरम्यान मी काही व्यवसाय देखील सुरू केले होते. परंतू माझे सर्व व्यवसाय तोट्यात जाऊ लागले. मी काही गुप्तदान करण्यास देखील सुरूवात केली होती. पण गुप्तदान केल्यानंतर काही दिवसांनी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझ्या जवळच्याच माणसांनी मला लुटलं. दानशूर बनण्याच्या नादात मी अनेकदा ५० हजार रूपयांची रक्कम देखील दान करत गेलो." दारूच्या आहारी गेला होता सुशील कुमार सुशील कुमारच्या पत्नीने त्याला अनेकदा लोकांची पारख करण्यासाठी सांगितलं होतं. पण त्याच्या पत्नीसोबतच्या नात्यात देखील दुरावा येऊ लागला. याच दरम्यान सुशीलने एक कार खरेदी केली होती. ही कार त्याचे मित्र दिल्लीत चालवत असत. कार संबंधित कामांसाठी त्याला दिल्लीत येणं-जाणं करावं लागत होतं. त्यावेळी सुशीलची ओळख काही चुकीच्या व्यक्तींसोबत झाली आणि त्यांच्या संगतीत राहून तो देखील दारूआणि सिगारेटच्या आहारी जाऊ लागला. काही दिवसांनतर त्याचा बराचसा वेळ चित्रपट पाहण्यात जाऊ लागला. यामुळे त्याची पत्नी त्याच्या नाराज होत असायची. त्यांच्यातील हा वाद इतका वाढला की पुढे जाऊन त्यांच्या घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचला. आयुष्यात इतकं सगळं घडत असताना सुशील कुमारने वेळीच या सर्व गोष्टींवर विचार करण्यास सुरूवात केली. या सगळ्या नरकयातनातून बाहेर येण्यासाठी सुशीलला बरीच मेहनत घ्यावी लागली. त्याने दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही त्याच्या हाती अपयशच आलं. याच दरम्यान तो अनेक वादांच्या भोवऱ्यात देखील अडकला गेला. या सगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर अखेर त्याने शिक्षक बनण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुठे जाऊन त्याचे चांगले दिवस सुरू झाले. आजच्या घडीला तो एक शिक्षक रूपातून ज्ञान देण्याचं काम करत आहे. तसंच तो पर्यावरण संरक्षणासाठी देखील वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतो.