१९६५साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या ५०व्या वर्षानिमित्त दुरदर्शनतर्फे ‘स्मरणांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युद्धातील शहिदांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमुर्ती हे एकत्र येणार आहेत. याविषयी बोलताना सुरेश वाडकर यांनी अशा कार्यक्रमासाठी निवड झाल्याने खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. देशासाठी हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानापुढे, आजवर संगीतक्षेत्रात आपण केलेली कामगिरी फार लहान असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कविता कृष्णमुर्ती यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांसाठी काही तरी करणे, ही भावनाच माझ्यासाठी अत्यंत सन्मानजनक असल्याचे सांगितले. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. याशिवाय, कार्यक्रमाला साजेशी गाणी निवडण्याची तयारी सुरू असल्याचे समजत आहे.