सध्या सोशल मीडियावर ‘कौन बनेगा करोडपती १४’ची जोरदार चर्चा आहे. गेल्या २२ वर्षांपासून अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. या वयात देखील त्यांचा कामाप्रती उत्साह थक्क करणारा आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये कटेस्टंट रुपिन शर्मा यांनी १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर जेव्हा खेळ थांबवला त्यावेळी या प्रश्नचं उत्तर सांगताना अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांचा एक किस्सा शेअर केला आणि हा किस्सा सांगताना ते खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले.

रुपिन शर्मा यांना १२ लाख ५० हजारांसाठी, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्या युरोपियन शहरातील महापौरांनी ३० मे २०२२ रोजी खास ट्रॅम पाठवली होती?’ असा प्रश्न विचारला होता. पण या प्रश्नाचं उत्तर लाइफलाइन वापरूनही रुपिन यांना देता आलं नाही. या प्रश्नासाठी पोजनन, वारसॉ, व्रोक्लॉ आणि क्रकाऊ असे चार पर्याय होते. या प्रश्नावर रुपिन यांनी खेळ थांबवला. त्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नचं अचूक उत्तर ‘व्रोक्लॉ’ असल्याचं सांगतानाच या शहराशी संबंधी त्यांच्या वडिलांचा एक किस्साही शेअर केला.
आणखी वाचा- KBC 14: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नासाठी आमिरने वापरली लाइफ लाइन, तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर?

अमिताभ बच्चन म्हणाले, “व्रोक्लॉ हे पोलंडमधील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरात साहित्याला खूप मान सन्मान मिळतो. व्रोक्लॉ हे शहर ‘एल्फ सिटी’ म्हणूनही ओळखलं जातं. या शहरात जगभरातील गाजलेल्या साहित्यिकांचे पुतळे आहेत. दोन वर्षांपूर्वी माझे पुज्यनिय वडील हरिवंश राय बच्चन यांचा पुतळा पोलंडमध्ये उभारण्यात आला. त्याच्या उद्घाटनासाठी आम्हाला तिथे निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथल्या १२-१५ वर्षांच्या मुलांनी बाबूजींनी १९३५ साली लिहिलेली मधुशाला गायली होती.” हे सर्व सांगताना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

दरम्यान सध्या केबीसीच्या १४ वं पर्व बरंच गाजताना दिसत आहे. सोशल मीडियावरही या पर्वाची बरीच चर्चा सुरू आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या मंचावर अनेक चाहते बिग बींना भेटण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. या मंचावर धनलभासोबतच स्पर्धकांची अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा पूर्ण होते.