बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा लोकप्रिय शो आहे. या शोचा सध्या सुरू असलेला सातवा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. करण त्यांना प्रश्न विचारून बोलतं करत असतो. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने हजेरी लावली. गौरीसह शोमध्ये माहीप कपूर आणि भावना पांडेदेखील पाहुण्या म्हणून आल्या आहेत. 

‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये गौरीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले आहेत. गौरीने आर्यन, सुहाना आणि अबराम या आपल्या मुलांबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. करणने गौरीला आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अडकला होता त्याबद्दलही प्रश्न विचारला. यावर गौरी उत्तर देत “आमच्या कुटुंबासाठी त्या प्रसंगातील काळ फार कठीण होता”, असं म्हणाली.

हेही वाचा >> गौरीला अजिबात आवडत नाही शाहरुखची ‘ही’ सवय; म्हणाली, “त्याच्या या सवयीमुळे पार्टी…”

हेही वाचा >> प्रकाश राज यांनी दत्तक घेतलेल्या गावाचे फोटो तेलंगणातील शहरी विकासमंत्र्यांनी केले शेअर, म्हणाले “हे गाव…”

गौरी पुढे म्हणाली, “त्यावेळी आमचं संपूर्ण कुटुंब फार कठीण प्रसंगातून गेलं आहे. ज्या प्रसंगातून आम्ही गेलो आहोत, त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांप्रती प्रेम आहे. आता कोणत्याही प्रसंगाचा आम्ही मिळून सामना करू शकतो. या कठीण प्रसंगात अनेक मित्र-मैत्रिणी आमच्याबरोबर होते. परंतु, ज्यांना आम्ही ओळखत नव्हतो अशाही काही लोकांची साथ मिळाली. अनेकांचे मेसेज यायचे. या सगळ्यांची मी आभारी आहे”.

हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ऑक्टोबर २०२१मध्ये मुंबई क्रुज ड्रग्ज केस प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो अनेक दिवस जेलमध्ये होता. परंतु, नंतर एनसीबी या प्रकरणात त्याला क्लीन चीट दिली.