महाराष्ट्रात नाटकांची एक समृद्ध परंपरा आहे. आजही नाटक पाहणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे; जो न चुकता नाटक पाहायला जातो. नाटक पाहण्याकरता अनेक नाट्यरसिक येत असतात; पण त्यातील काही प्रेक्षक हे कलाकारांसाठी उपद्रवी ठरतात. नाटक सुरू होण्याआधी रंगमंचावरुन अनेकदा प्रेक्षकांसाठी त्यांचे मोबाईल फोन बंद करण्यासाठी सूचना केली जाते. मात्र तरीही काही प्रेक्षकांकडून मोबाईल फोन सुरूच राहतात आणि ते चालू नाटकात वाजतात, ज्यामुळे कलाकारांना त्रास होतो.
नाटकाच्या चालू प्रयोगात मोबाईल फोन वाजल्याबद्दल अनेक कलाकारांनी त्यांचा रोष, नाराजी आणि वेळप्रसंगी संतापही व्यक्त केला आहे. अशातच आता या विषयावर अभिनेत्री लीना भागवत यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. लीना भागवत या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या नाटक आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. लीना भागवत यांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नाटकात वाजणाऱ्या मोबाइल फोनबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं
यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “काही प्रेक्षक नाटक सुरू झाल्यानंतरही मोबाईल वापरतात. पण याला काही करु शकत नाही. हा हतबलतेचा त्रास आहे. म्हणजे मला भीती वाटते की, जेव्हा ब्लॅक-आऊट होतो तेव्हा एखादा लाइट दिसतो. मोबाईमध्ये कोणीतरी काहीतरी चेक करत असतं किंवा नाटक संपल्या संपल्या आम्ही (कलाकार) रंगमंचावरुन जायच्या आधी प्रेक्षक ‘एक फोटो हवा आहे’ म्हणून येतात. प्रेक्षकांविषयी मला खूप आदर आहे; पण मी हे बोलतेय.”
यापुढे त्या म्हणाल्या की, “मला असं वाटतं की, माझ्या सादरीकरणात इतकी त्रुटी आहे का? की मी नाटक संपल्यानंतर मी प्रेक्षकांना एक मिनिटही खिळवून ठेवले शकले नाही. मी आता इतकं कुचकं काम केलं का? की लोक तिथे थांबून राहिले नाही. मी हे आता काय बघितलं असं लोकांना वाटलं नाही. मी म्हटलं तसं मायबाप रसिक, आई-वडील आहात तुम्ही. पण मग आई-वडील ही चुकतात की… पण मग आई नको ना गं करु असं सांगितल्यावर आई नाही रागवत, मग त्यांनी आमच्यावर का रागवावं? खरंच थांबा ना… दोन मिनिटे तरी थांबा… तुमचे फोन नको वाजूदेत.”
दरम्यान, लीना यांनी ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘अधांतर’, ‘चल तुझी सीट पक्की’, ‘वैशाली कॉटेज’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. रंगभूमीवर सध्या त्यांचं ‘आमने सामने’ हे नाटक सुरू आहे. या नाटकांशिवाय त्यांनी ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.