एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळलं. सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २९ जून रोजी जनतेशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. फक्त सामान्य लोक नव्हे तर कलाकार मंडळी देखील याबाबत आपलं मत मांडताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “खरंच वाईट वाटतंय कारण…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमे झाला भावूक

अभिनेता हेमंत ढोमे पाठोपाठ ‘बिग बॉस’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने देखील एक ट्विट केलं आहे. आरोह कोणत्याही विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडताना दिसतो. महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना देखील आरोहने सोशल मीडियाद्वारे याबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं.

आरोह वेलणकर काय म्हणाला?
“महाराष्ट्राची जनता जिंकली” अशा प्रकारचं ट्विट आरोहने केलं आहे. आरोहने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी त्याला कमेंट्सच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं आहे. हे ट्विट केल्यानंतर आरोहने आणखी एक ट्विट केलं. त्यामध्ये त्याने बऱ्याच वर्षांपूर्वीच्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर केला आहे.

जुन्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर करत आरोहने म्हटलं की, “जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं.” त्याचं हे ट्विट पाहून एका युजरने म्हटलं की, “साहेबांनी स्वतःच्या जीवावर फोडले होते आमदार. ईडी, सीबीआय मागे लावून फडणवीसांसारखं केलं नव्हतं.” आरोहच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.