मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर सर्व स्तरातून टीका होत आहे. आघाडीचा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यानेही, “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा”, असं म्हणत कंगनाला सुनावलं आहे. यापूर्वी रेणुका शहाणेनेही “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असं ट्विट करत कंगनाच्या वक्तव्याचा समचार घेतला.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना रणौत सातत्यानं भाष्य करत असून काही दिवसांपू्र्वी तिने, “मला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते” असं म्हणत मुंबई पोलिसांवर निशाणा साधला होता. त्यानंतर काल तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली. “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटतेय?”, असं कंगना ट्विट करत म्हणाली. तिच्या या ट्विटवर सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे. “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा”, असं सुबोधने कंगनाला सुनावलं आहे.

यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही ‘कंगनाव्हायरस’ असा हॅशटॅग वापरत, “या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus ” असं म्हणत कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केलाय.


सोशल मीडियावरही अनेक नेटकऱ्यांकडून कंगनाच्या वक्तव्यावर टीका होत असून ‘आमची मुंबई’ हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला आहे.