मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम हंक म्हणून अभिनेता गश्मीर महाजनी ओळखला जातो. आपल्या अभिनयानं मोठा पडदा व्यापल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळविला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. गश्मीर हा इमली या हिंदी मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच गश्मीरने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर त्या मालिकेत काम करणारी त्याची सहकलाकार अभिनेत्री मयुरी देशमुख हिने प्रतिक्रिया दिली. इंडिया फोरमला दिलेल्या एका मुलाखतीत मयुरी म्हणाली की, "एखादी मालिका सोडणे हा त्या अभिनेत्याचा वैयक्तिक निर्णय आहे. मी त्यावर भाष्य करु इच्छित नाही. पण तो एक फार चांगला अभिनेता आहे. त्याच्यासारख्या एक अद्भुत व्यक्तीला या मालिकेतून माणूस म्हणून जाणून घेणे हा चांगला अनुभव होता." "या मालिकेत सुरुवातीच्या दिवसातील काही सीन्स मी फार एन्जॉय केले. आदित्य आणि मालिनी यांच्या भांडणाचा तो काळ होता. यातील काही दृश्य ही फार नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. आम्ही दोघेही आमच्यातील इनपुट देण्याचा आणि त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. या दृश्यांना प्रेक्षकांनीही दाद दिली. आमची मूळ ही महाराष्ट्रीयन संस्कृतीत बांधली गेली आहेत, त्यामुळे हे घडले," असे मयुरीने सांगितले. "आम्ही एकमेकांशी मराठीत बोलणे हे अगदी सामान्य होते. हा मुद्दाम केलेला प्रयत्न अजिबात नव्हता. म्हणजे समजा दोन बंगाली लोक एकत्र आली तर ती बंगालीत बोलतात, त्याचप्रकारे हे होते. एकूणच गश्मीरसोबतचा हा प्रवास खूप छान होता," असेही मयुरी देशमुख म्हणाली. स्टार प्लसवरील इमली ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेची कथा गावात राहणाऱ्या इमली नावाच्या मुलीची आहे, तिचे शहरातील एका मुलाशी लग्न होते. त्यानंतर ती शहरात जाऊन आयुष्य कसे घालवते, यावर याचे कथानक आधारित आहे. या शोमध्ये गश्मीर महाजनीने आदित्य त्रिपाठीची भूमिका साकारली होती. तर मयुरी देशमुखने या मालिकेत मालिनीचे पात्र साकारले आहे.