Riteish Deshmukh on Operation Sindoor : दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यायला हवं, अशी मागणी होत होती. याचदरम्यान संरक्षण मंत्रालयाने मोठी माहिती दिली आहे. भारताने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. या ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल अभिनेता रितेश देशमुखने पोस्ट केली आहे.
रितेश देशमुखने पहाटे ३ वाजता एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ चे पोस्टर शेअर करून ‘जय हिंद की सेना…भारत माता की जय’ असं लिहिलं. त्याचबरोबर त्याने #OperationSindoor हॅशटॅग वापरला आहे.
रितेश देशमुखची पोस्ट
रितेश देशमुखच्या या पोस्टवर ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’, ‘भारताने दहशतवादाविरोधात केलेली कारवाई योग्य आहे,’ अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील त्या नऊ ठिकाणांवर हल्ले केले, जिथून भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला. पाकिस्तानमधून कारवाया करणारे लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतानं हल्ला केला. भारताने कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नसून फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, भारतात आज मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आली होती. त्याची तयारी सुरू होती. त्याचदरम्यान बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. पंतप्रधान मोदी या एअर स्ट्राईकवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं समजतंय.