Umesh Kamat on Marathi Movies : मराठी चित्रपटांनी गेल्या दोन महिन्यांत चांगलंच यश मिळवलं आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी काही चित्रपटांनी प्रेक्षक पसंतीबरोबरच बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलीच कमाई केली. ‘एप्रिल मे ९९’, ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ शिवाय ‘जारण’ या मराठी चित्रपटांना चांगलंच यश मिळालं. त्यामुळे मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत आणि हे चित्र आश्वासक आहे.
मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल अनेक मराठी कलाकार त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. तसंच प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद असाच असावा अशी अपेक्षाही व्यक्त करत आहेत. अशातच मराठी अभिनेता उमेश कामतने मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उमेशने सकाळला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत, या गोष्टीचा आनंद असल्याचं म्हटलं.
यावेळी उमेश असं म्हणाला, “मराठी प्रेक्षक वेळ काढून, पैसे खर्च करून, काही अंतर चालून आणि तिकीट काढून चित्रपट बघायला येत आहेत. अशा परिस्थितीत आपण मराठी चित्रपटांचा विचार केला तर सगळीकडे बोंबाबोंब होत होती की, मराठी चित्रपट चांगले सिनेमे बनत नाहीत किंवा पोहोचत नाहीत. तर हे सगळं ऐकत असतानाच चित्रपट चालत आहेत, हे ऐकून बरं वाटतं.”
उमेश कामत इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे तो म्हणाला, “मला माहीत आहे, अजून चांगली परिस्थिती यायला हवी आहे; पण तरीही चित्रपट चालत असल्याची बाब आम्हा कलाकारांसाठी सुखावणारी आहे आणि कुठे तरी एक आशा देणारी आहे. कलाकारच नव्हे, तर अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींसाठी ही चांगली गोष्ट आहे. कारण कुठे तरी एक उमेद मिळाली की, आणखी चांगलं काम केलं जातं आणि त्यामुळे अजून चांगले सिनेमे बनतात.”
यानंतर त्याने म्हटलं, “आपण प्रत्येक वेळेस इतर भाषातील उदाहरणे देत असतो, त्यांचं कौतुक करतो. ते तर आहेच आणि ते कौतुक करायलाच हवं. पण म्हणून आपण आपल्याला वाईट म्हणण्याची गरज नाही. आपण प्रत्येकवेळी किती कमी पडत आहोत हे सांगण्याऐवजी आपण प्रयत्न करायला हवेत.”
दरम्यान, मराठीतील काही लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत उमेशचं नाव आवर्जून घेतलं जातं. लवकरच त्याचा ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडीत हे मुख्य भूमिकांत आहेत. तसंच या चित्रपट संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे यांच्यासह अनेक कलाकारांची फौज आहे.