विशुद्ध कला आणि पैसा, प्रसिद्धी आणि महत्त्वाकांक्षा यांचं नातं सहसा परस्परविरोधीच राहिलेलं आहे. फारच क्वचित ते समांतर पातळीवर असलेलं दिसतं. त्यातही कला आणि जगण्यातील नैतिकता यांचाही खरं तर जवळचा संबंध असायला हवा. पण तोही बऱ्याचदा तसा असतोच असं नाही. अशात महत्त्वाकांक्षेने कलाव्यवहारात प्रवेश केला की कलेचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. याच मुद्द्यावरचं ‘फिल्टर कॉफी’ हे महेश मांजरेकर लिखित- दिग्दर्शित नाटक अलीकडेच रंगभूमीवर आलेलं आहे.
अनिता ही एक उत्तम चित्रकार. तिचा नवरा सतीश हाही याच प्रांतातला. जास्तच कलावादी. जीवनातील सगळ्या चांगल्या गोष्टींचा भरभरून आस्वाद घेणारा. मस्त कलंदर. पण दीड वर्षांपूर्वी त्याचं अचानक अपघाती निधन झालं आणि अनिताचं आयुष्यातील स्वारस्यच संपलं. आता आला दिवस ढकलायचा एवढंच ती करत असते. तिचा आणि सतीशचा चित्रकार मित्र संदीप याचाच काय तो आता तिला आधार असतो. (संदीपही खरं तर तिच्या प्रेमात असतो. पण ते व्यक्त करायचं त्याच्याकडून राहून गेलेलं असतं.) आणि तिच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहणारी मानसी ही तिची जीवश्च मैत्रीण. विष्णू हा घरातील हरकाम्या नोकर तिची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्या मानत असतो.
अशात एके दिवशी विक्रम नावाचा मानसीचा आतेभाऊ त्या घरात आगंतुक म्हणून येतो आणि तो आपल्या बेदरकार हुशारीनं अनिताच्या घरासकट तिचा सर्वस्वी ताबाच घेतो. तो हरहुन्नरी, अफाट कष्टाळू, बेफिकीर आणि बिनधास्त असतो. आपल्याला जे मिळवायचंय ते येनकेनप्रकारेण मिळवल्याशिवाय राहायचं नाही, ही त्याची उपजत वृत्ती! साहजिकच तो अनिताच्या स्टुडिओचा ताबा घेतो. तिची चित्रं वाजवीपेक्षा जास्त दामात विकण्याची चलाखी दाखवतो. त्यामुळे अचानक अनिताच्या हाती प्रचंड पैसा येतो.
चित्रांचे क्लाएंट्स, डीलर, कलासंग्रहालयांचे चालक अशा सगळ्यांना विक्रमने खिशात घातलेलं असतं. त्याच्या या झंझावाती झपाट्याने अनिता अक्षरश: भिरभिरते. तिला हा वेग सहन होत नाही. पण तरीही ती विक्रमच्या या बहकाव्यात वाहवत जाते. संदीपला विक्रमची ही अकल्पित घोडदौड संशयास्पद वाटते. तो तसं अनिताला बोलूनही दाखवतो. पण अनिता ते फारसं मनावर घेत नाही. विक्रमने तिला आयुष्यात परत रस घ्यायला भाग पाडलेलं असतं. तिचं अवघं व्यक्तिमत्त्वच त्याने जणू ताब्यात घेतलेलं असतं.
खरं तर विक्रम मानसीचा आतेभाऊ वगैरे काही नसतो, तर तो तिचा प्रियकर असतो. पण ही गोष्ट ते दोघं अनितापासून लपवून ठेवतात.
बंगरूळूच्या एका कलाप्रदर्शनाच्या वेळी विक्रम अनिताला आपण तिच्या प्रेमात पडल्याची गोष्ट उघड करतो आणि ती हादरते. ती अजूनही सतीशच्या आकंठ प्रेमात असते आणि विक्रमकडे ‘त्या’ दृष्टीनं तिने कधी बघितलेलंही नसतं. पण त्यानं हे सगळं हुशारीनं जमवून आणलंय हे तिच्या त्याच क्षणी लक्षात येतं आणि ती त्याला ताडकन् तोडून बंगरूळूहून मुंबईला परतते. मानसी आपल्या वडलांच्या आजारपणामुळे बडोद्याला गेलेली असते. तिलाही ती बोलवून घेते.
झाला प्रकार ती तिला सांगते, तेव्हा विक्रमने तिलाही फसवल्याचं तिच्या लक्षात येतं. विक्रम मुंबईला येताच त्याला कोरा चेक देऊन आपल्यापासून दूर जाण्यास ती त्याला फर्मावते. मानसीचीही त्याने तिच्यासारखीच घोर फसवणूक केलेली असल्याने त्याबद्दलही ती त्याला चिडून जाब विचारते. तेव्हा निर्लज्जपणे तो तिला मानसीबद्दलची आपली ‘व्यावहारिक’ भूमिका व तिच्याशी असलेलं आपलं नातं स्पष्ट करतो आणि त्याबद्दल खोटी दिलगिरीही व्यक्त करतो. या सगळ्यामुळे एव्हाना तो अनिताच्या मनातून पार उतरलेला असतो. पण झाल्या प्रकाराबद्दल त्याला ना कसला खेद आहे, ना खंत हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती त्याला आपल्या परीनं धडा शिकवायचं ठरवते…
लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक वेगळा विषय या नाटकात हाताळला आहे. अनेकींना आपल्या जाळ्यात ओढून फसवणारा तरुण तर यात आहेच, पण कला, कलेप्रतीची निष्ठा, बांधीलकी, कला आणि जगण्यातील नैतिकता हेही मुद्दे यानिमित्ताने ऐरणीवर येतात, हे विशेष. पहिल्या अंकात नाटक कुठं चाललंय हे बराच काळ लक्षात येत नाही, कारण प्रस्तावनेतच ते रेंगाळतं. पण हळूहळू ते पकड घेत जातं. विक्रमची चाल लक्षात आल्यावर ज्या संयमिततेनं अनिता त्याला हाताळते तिथे नाटक वेगळं वळण घेतं.
विक्रमसारखा कुटील, निब्बर, महत्त्वाकांक्षी तरुण कुठल्या टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्ययही यथावकाश येतो. म्हटलं तर फसवणुकीचाच विषय या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. पण त्याला कलेचं अस्तर मिळाल्यानं तो थोडा वेगळा ठरतो. लेखक म्हणून महेश मांजरेकर यांनी ठोस पात्रं रेखाटली आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यांचे व्यवहारही कौशल्याने हाताळले आहेत. यातली सगळीच पात्रं हाडामांसाची वाटतात. विशेषत: विष्णू हे पात्र लव्हेबल झालं आहे. पात्रांचे परस्परसंबंध नीट गुंफले गेले आहेत.
फक्त एक गोष्ट खटकते : एवढ्या स्मार्ट, हरहुन्नरी, डोकेबाज विक्रमला साधी नोकरी मुंबईत मिळू नये? मानसीची नेमकी पार्श्वभूमी न कळल्याने तिचं अनिताच्या घरातलं स्थान न समजणारं. तसंच तिची आणि विक्रमची भेट कुठं आणि कशी झाली हेही गुलदस्त्यात राहिल्याने त्यांचीही इतकी घसट कशी, हाही प्रश्न अनुत्तरितच राहतो. अनिताची फिल्टर कॉफीही नको इतक्या वेळा नाटकात डोकावते.
संदेश बेंद्रे यांनी एलिट क्लासमधील अनिताचं आलिशान घर तपशिलांत उभं केलं आहे. हितेेश मोडक यांचं संगीत नाटकातले मूड्स उजळवणारं. लक्ष्मण गोल्लार यांची वेशभूषाही पात्रांची व्यक्तित्वं खुलवणारी. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे नाट्यपूर्ण क्षण अधोरेखित केले आहेत. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांना बाह्य व्यक्तिमत्त्व प्रदान केलं आहे. सगळ्याच कलाकारांनी मनापासून कामं केली आहेत.
महत्त्वाकांक्षी, डोकेबाज, स्ट्रीटस्मार्ट विक्रमच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी फिट्ट बसले आहेत. त्यांचा वावर, वागणं-बोलणं, या हातावरची थुंकी झटक्यात त्या हातावर घेणं यांतून त्यांनी विक्रमची गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा आणि त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी दाखवून दिली आहे. त्यांची थंड माथ्यानं सगळ्या गोष्टी करण्याची वृत्ती विक्रमचं टोकाला जाणं जायज ठरवते. नवऱ्या पश्चात एकाकी झालेली, जीवनातला रस हरवून बसलेली अनिता आणि नंतर विक्रमच्या बहकाव्यात येऊन तिचं वाहवत जाणं, आणि एका क्षणी आपल्यातील कलावंताची तिला झालेली जाणीव उर्मिला कानेटकर यांनी उत्कटपणे दर्शवली आहे. त्यांचं वागणं, वावरणं सहज आहे.
संदीपच्या भूमिकेतील विक्रम गायकवाड संयमिततेनं आपलं व्यक्तिमत्त्व आकारतात. त्यांचं ‘लो प्रोफाइल’ असणं संदीपच्या भूमिकेला खरेपण देतं. अंकिता लांडे या मानसीचा उद्रेक आणि तिची घालमेल नेमकेपणाने व्यक्त करतात. त्यांना उचित पार्श्वभूमी मिळती तर बरं झालं असतं. कुणाल मेश्राम यांनी अनिताचा हरकाम्या नोकर विष्णू लोभसपणे साकारला आहे. त्यांचं वैदर्भीय बोली आणि अधूनमधून तोडक्यामोडक्या इंग्लिश भाषेतलं बोलणं प्रेक्षकांना छानपैकी रिझवतं.