छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'कारभारी लयभारी'. राजकारण आणि प्रेमावर आधारित ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेमात आणि राजकारणात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं. मात्र, तेच आता विरू आणि पियूच्या बाबतीत घडताना दिसत आहे. सूर्यवंशी आणि पाटील या दोन कुटुंबांमधील वाद विसरुन हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे वीरु लवकरच त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. अंकुशराव पाटील आणि सूर्यवंशी यांचं राजकारणातील वैर साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यांचं हे वैर केवळ राजकारणापुरतंच मर्यादित नसून ते कौटुंबिक पातळीवरदेखील त्यांच्यातील कलह पाहायला मिळतोय. यामध्येच पियू आणि राजवीरची मैत्री होते आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत असल्याचं दिसून येत आहे. पियू आणि वीरुमधील मैत्री आता हळूहळू फुलू लागली आहे. त्यामुळे वीरु आता पियूच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे लवकरच तो त्याच्या प्रेमाची कबुली पियूसमोर देणार आहे. मात्र, आता वीरुने त्याच्या भावना व्यक्त केल्यानंतर त्यावर पियू नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.