क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचे नाते दिवसेंदिवस अधिकच घनिष्ट होत चालले आहे. त्यामागचे कारण सर्वांनाच ठाऊक आहे. काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच विवाहबंधनात अडकल्यानंतर अनेकांच्याच नजरा वळल्या आहेत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि क्रिकेट जगतातील एक नावाजलेला खेळाडू म्हणजे विराट कोहली. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का विविध कार्यक्रमांनाही एकत्र हजेरी लावत आहेत. त्यामुळे या दोघांच्या नात्याला लग्नाचे नाव कधी दिले जाणार यासंबंधीचेच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहेत. याच प्रश्नांना पूर्णविराम देत अनुष्का शर्माने लग्नाविषयीची तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

yuvi-1-620x400

लग्नाविषयी विचारले असता अनुष्का म्हणाली की, ‘कोणत्याही मुलीप्रमाणे आयुष्याच्या एका वळणावर मलासुद्धा लग्न करायचे आहे. पण, मला त्याची घाई नाहीये’. २८ वर्षीय अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या कारकिर्दीतील यशाच्या वाटेवर चालत आहे. त्यामुळे याला अनुसरुनच अनुष्का म्हणाली, ‘सध्यातरी मी लग्न करण्याच्या विचारात नाहीये. माझे लग्न होईल हे खरे, पण ते कधी हे मलाही माहित नाही. मी इतरांप्रमाणेच माझे आयुष्य जगत आहे. आयुष्याच्या आखणीमध्ये लग्नाचाही सहाजिकपणेच सहभाग आहे’. आज तक या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये अनुष्काने हे वक्तव्य केले आहे.

‘कोणत्याही अभिनेत्रीला तिच्या लग्नानंतरही चांगल्या भूमिकांसाठी विचारले जाते. किंबहुना मुलं झाल्यानंतरही अभिनेत्रींना तगड्या भूमिकांसाठी विचारले जाते. त्यामुळे मी लग्नानंतरही चित्रपटसृष्टीमध्ये काम करणे सुरुच ठेवणार आहे. मला अशा लोकांची चीड आहे ज्यांना अभिनेत्रींचे आयुष्य सीमित वाटते’, असे ठाम मत अनुष्काने यावेळी मांडले. लग्नासंबंधीची भूमिका स्पष्ट केल्यानंतर घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावरही अनुष्काने तिची प्रतिक्रिया दिली. ‘मी खुप सर्वसाधारण व्यक्ति आहे. मला असं वाटतं की लग्न एकदाच होतं त्यामुळे त्यात समतोल राखला गेला पाहिजे. पण, वाढत्या घटस्फोटांचं कारण आहे स्त्रियांमध्ये झालेला बदल. स्त्रियांची बदललेली वैचारिकशक्ति आणि स्वालंबीपणा पाहता आता एका सुरक्षित जीवनासाठी चांगल्या व्यक्तिची निवड करण्याला सध्या जास्त प्राधान्य दिले जात आहे. पण, हेही तितकेच खरे आहे की, कोणत्याही नात्यामध्ये प्रयत्न करावेच लागतात’, असेही अनुष्का म्हणाली. अनुष्का शर्मा सध्या विविध कार्यक्रमामध्ये विराटसोबतच जात आहे. या जोडीला एकत्र पाहून चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.