महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधील गडकिल्ल्यांचा विकास वेगाने झाला. त्यामुळे पर्यटक राजस्थान, गुजरातमध्ये आनंदाने जातात. मात्र महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची दुर्दशा कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने गडकिल्ल्यांचा विकास करावा, हेरिटेज हॉटेल्स बनवण्याची काही गरज नाही. उलट गडकिल्ल्यांना धक्का न लावता विश्रामगृह उभारायला हवे, असे मत अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिलिंद गुणाजी म्हणाले, ''राज्याच्या कुशीत अनेक सुंदर पर्यटन स्थळे दडलेली असून, चित्रिकरणातून मिळणाऱ्या फावल्या वेळात पर्यटनस्थळी भेटी देतो आणि लेखन करतो. पर्यटन स्थळाचा अभ्यास करताना इतिहासाच्या खाणाखुणा शोधताना फार मजा येते. मला सर्वात जास्त माथेरान आवडते. महिन्यातून दोनदा तेथेच राहतो.'' समाज माध्यमांच्या आहारी न जाता, पर्यटन हाच छंद जोपासल्याचे गुणाजी म्हणाले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याविषयी त्यांनी पुढे म्हटलं, ''लोक माझ्या नावाने नव्हे तर चित्रपटातील भूमिकेवरून मला ओळखतात. भेटले की, उत्साहाने संवाद साधतात, छायाचित्र व सेल्फी काढतात. दाक्षिणात्य भाषा येत नसल्यातरी तिथल्या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रापेक्षा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकांमध्ये वक्तशीरपणा आहे. ''