मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. यात तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. या चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील मानुषीच्या लूकची प्रचंड चर्चा पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून मानुषी ही लवकरच आणखी एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नुकतंच मानुषीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतील चित्रपटाबद्दल खुलासा केला. यावेळी मानुषीला, ‘तू शेवटची कधी रडलीस?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “मी आलिया भट्टचा चित्रपट पाहिल्यावर फार रडली होती. मी काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटातील कथा मला फारच आवडली. तो चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.”

आणखी वाचा – “मी १०० वर्षांची होईपर्यंत काम करेन…” गरदोरपणाबद्दलच्या प्रश्नावर आलिया भट्टचे सडेतोड उत्तर

“कोणी खोटं बोललं आणि खोटं बोलल्यानंतर ते लपवण्याचा प्रयत्न केल्याचे मला दिसलं तर मला फारच त्रास होतो. मला स्वतःला व्यावहारिक म्हणवून घ्यायला मला आवडते, पण मी पटकन भावूक होते,” असेही मानुषीने म्हटले.

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट यावर्षी २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट गंगा जगजीवनदास काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटातील आलियाच्या अभिनयाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा – आलिया भट्ट ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म, डिलिव्हरीसाठी रुग्णालयाचं बुकींग झाल्याच्याही चर्चा

दरम्यान मानुषी छिल्लर सध्या जॉन अब्राहमसोबत ‘तेहरान’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अरुण गोपालन दिग्दर्शित आणि रितेश शाह, आशिष प्रकाश वर्मा यांनी लिहिलेला हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबद्दल काहीही माहिती समोर आलेलं नाही