मोहन शर्मा हे लोकप्रिय अभिनेते, निर्माते आहेत. त्यांनी आतापर्यंत २० सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांनी विविध भाषांतील जवळजवळ ५० सिनेमांतील महत्त्वपूर्ण भूमिकांसह साधारण १०० सिनेमांत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चारही दाक्षिणात्य भाषांमध्ये सिनेमांची निर्मिती करणारे पहिले निर्माते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

याबरोबरच, त्यांनी ‘साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. मोहन शर्मा यांनी नुकतीच ‘ट्रेंड टॉक्स’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कठीण काळाबद्दल वक्तव्य केले. तसेच, जेव्हा त्यांना गरज होती, त्यावेळी कोणी मदत केली, याचीही माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, “पायावर आलेल्या गाठीमुळे माझ्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर मला चालताही येत नसल्यानं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. त्याशिवाय माझ्या पायाचा लिगामेंटही फाटला होता. या शस्त्रक्रियांसाठी माझे सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च झाले. त्याशिवाय मला व्हर्टिगो, उच्च रक्तदाब व मधुमेहाचाही त्रास आहे. मला दररोज इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात. केवळ औषधांसाठीच दर महिन्याला मला सुमारे ३५ हजार रुपये खर्च येतो.” यादरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांनी मदतीचा हात पुढे केल्याचे त्यांनी सांगितले.

रजनीकांत यांच्याबद्दल काय म्हणाले अभिनेते?

वृद्धाश्रमात राहण्याबद्दलही त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “एक वेळ अशी आली होती की, माझ्याकडे औषधे घेण्यासाठीही पैसे नव्हते. माझी परिस्थिती कोणालाही सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती. त्यावेळी रोटरी क्लबमधील माझ्या मित्रांनी, जे या संस्थेचे विश्वस्त आहेत, मला तेथे राहण्याचा सल्ला दिला.”

चित्रपटसृष्टीत इतके काम करूनही त्यांच्यावर ही वेळ कशी आली, याबद्दल ते म्हणाले, “माझा शेवटचा चित्रपट ‘ग्रामम/नम्मा ग्रामम’ (Gramam/Namma Gramam) या द्विभाषिक चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपटगृहांचे भाडे, प्रसिद्धी आणि पोस्टर्सचा खर्च मला स्वतःलाच करावा लागला. त्यामुळे चित्रपटाचे बजेट ठरलेल्या मर्यादेपेक्षा खूपच वाढले. सुरुवातीला १.२५ कोटी रुपयांचे बजेट ठरवले होते; मात्र अखेर हा खर्च तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत गेला.”

“जयललिता यांच्या घराच्या…”

ते पुढे म्हणाले, “माझे घर पोएस गार्डनमध्ये, जयललिता यांच्या घराच्या अगदी शेजारी होते. त्यांनी मला, मी ते घर घ्यावे, असा सल्ला दिला होता.एकदा एव्हीएम स्टुडिओमध्ये जयललिता बाहेर बसून काहीतरी वाचत होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. मला पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की, त्यांच्या परिसरात म्हणजेच पोएस गार्डनमध्ये एक चांगला हाउसिंग प्रोजेक्ट येत आहे. मला ते घर घेण्याच्या बाबतीत २,५०० चौरस फुटांचा फ्लॅट घेण्याचा सल्ला त्यांनी मला दिला होता. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी तो फ्लॅट खरेदी केलाही.मात्र, शेवटी कर्ज फेडण्यासाठी मला तो विकावा लागला.”

त्यांनी याच मुलाखतीत असेही सांगितले की, जयललिता यांच्याबरोबर उत्तम संबंध होते. त्यांच्या निधनाच्या आधी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, बरी होऊन मी घरी येईन; मात्र रुग्णालयातच निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का बसल्याचे मोहन शर्मा यांनी सांगितले.

रजनीकांत यांच्याबद्दल मोहन शर्मा म्हणाले, “रजनीकांत यांनी मला देवासारखी मदत केली. त्यांनी मला फोन करून माझ्या बँक खात्याचा नंबर विचारला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी माझ्या खात्यात एक लाख रुपये पाठवले. त्यांच्या मदतीमुळेच मी सावरू शकलो. त्यामुळे माझा स्वाभिमानही जपला गेला. मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. जगासाठी ते सुपरस्टार आहेत; पण माझ्यासाठी ते देवाचा अवतार आहेत.”

मोहन शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती देताना, “मी आणि पत्नी वेगळे झालो आहोत. मला एक मुलगा आहे. तो जर्मनीत राहतो. माझी काळजी घेण्यासाठी भारतात येऊ का, असे त्याने विचारले होते; पण मी त्याला नको, असे सांगितले. त्याने स्वतःचे घर घेतले आहे आणि त्याच्या घराचे ईएमआय भरायचे आहेत. त्याने मला सांगितलं की, तो लगेच मला आर्थिक मदत करू शकत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर मदतीसाठी दबाव टाकला नाही”, असे सांगत ते वृद्धाश्रमात का राहतात, ते स्पष्ट केले.