१६ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १६ सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरवले होते. तसेच तिकिट शुल्कात मोठी सवलत म्हणजेच ७५ रुपयांत चित्रपट दाखवण्याचा निर्णय ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला होता. नुकतंच याविषयी खुलासा करत मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने हा दिवस पुढे ढकलला नाही.

बॉलिवूड हंगामाला मिळालेल्या माहितीनुसार १६ सप्टेंबर ऐवजी २३ सप्टेंबरला हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे. यामागचं कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट असल्याचं समोर आलं आहे. सध्या हा एकमेव मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतोय, सोमवारीसुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईमध्ये अडथळा येऊ नये यासाठी डिज्नीने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडे ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ पुढे ढकलण्याची विंनती केली.

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियालादेखील डिज्नीने केलेली ही मागणी रास्त वाटली, ब्रह्मास्त्र हा तसा महागडा चित्रपट आहे. तो लोकांसमोर आणण्यासाठी कित्येक वर्षांची मेहनत आणि पैसा खर्ची झाला आहे. अशावेळी या चित्रपटाचं तिकीट ७५ रुपयांत विकून त्यावर परिणाम होऊ शकतो. बऱ्याच दिवसांनी ‘ब्रह्मास्त्र’ने थिएटरमालकांना खूप जास्त बुकिंग करून दिल्याने त्यांचं झालेलं नुकसान यात भरून निघालं आहे. त्यामुळेच डिज्नीची ही मागणी मान्य करून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’वर सडकून टीका करणाऱ्या कंगना रणौतच्या वक्तव्यावर कॉमेडीयन कुणाल कामराची प्रतिक्रिया

तज्ञांच्या मते ‘ब्रह्मास्त्र’चे तिकीटदर महाग असले तरी लोकं हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे त्यामुळे अशा वेळी या चित्रपटाचं तिकीट एवढं कमी करणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरच राष्ट्रीय चित्रपट दिन पुढे ढकलण्यामागे ‘ब्रह्मास्त्र’ हेच मुख्य कारण असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज, सिटीप्राइड या बड्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार चित्रपटगृहात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.