‘जो स्वत:वर विनोद करू शकतो तोच उत्तम विनोदी लेखक होऊ शकतो. पुलंना हे सहजगत्या जमले होते. त्यामुळे त्यांचा विनोद हा निर्विष असे. कुणीही व्यक्ती त्याने दुखावली जात नसे. अर्थात विनोद न समजणारे अरसिक पुलंच्या काळातही होते, आजही आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. तथापि उत्तम विनोदकार मात्र हल्ली कमी झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे,’ असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांनी काढले.नाटय़क्षेत्रातील अशोक मुळ्ये यांनी आयोजित केलेल्या माझा पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. टिकेकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्यांना माझा पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.‘माझा पुरस्काराच्या निमित्ताने कला क्षेत्रातले माझे सहप्रवासी आपल्या कारकीर्दीकडे चौकसपणे पाहत आहेत हे प्रथमच जाणवले आणि खूप बरे वाटले. अशोक मुळ्ये यांचा ‘माझा पुरस्कार’ ही आपले काम योग्य दिशेने चालले असल्याची एक प्रकारे पावती आहे. त्यामागे आपुलकीची भावना आहे,’ असे अभिनेते हृषिकेश जोशी पुरस्कार घेतल्याानंतर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. या सोहळ्यात ‘पोश्टर बॉइज’ चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील, ‘लोकमान्य’चे दिग्दर्शक ओम राऊत, पत्रकार श्रीकांत बोजेवार, विनय परब, सचिन टेके, स्वाती पाटील, सूर्यकांत गोवळे आदींना माझा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात अशोक मुळ्ये यांनी माझा पुरस्कारामागची आपली भूमिका स्पष्ट करतानाच कला, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रांवर मार्मिक आणि हास्यस्फोटक शेरेबाजी करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलगीतांवर आधारित ‘धुंदी कळ्यांना’ हा सुश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आला.