‘बिग बॉस मराठी’मधील सूत्रसंचालनामुळे प्रेक्षकांची पसंती मिळवलेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप २’चं सूत्रसंचालन करत आहे. स्पर्धकांच्या चुका निदर्शनास आणून देणारा आणि त्यांना योग्य वेळी समज देणारा रितेश देशमुख नेहमी शांतपणे परिस्थिती हाताळताना दिसतो. मात्र, समोर आलेल्या ‘लॉक अप’च्या नवीन प्रोमोमध्ये तो एका स्पर्धकावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे.

‘लॉक अप २’ हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून आगामी भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं दिसत. प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांना, “तुम्ही सगळे आता एकमेकांबरोबर खूपच कम्फर्टेबल झाला आहात. त्यामुळे तुमच्या सेलमेट्समध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं सांगताना दिसत आहे.

रितेश देशमुखने स्पर्धकांना ‘कंट्रोलर’ आणि ‘डिपेंडंट’ अशा दोन गटांत विभागले. यामध्ये कंट्रोलर असलेल्या स्पर्धकाकडे डिपेंडंट स्पर्धकाचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार असणार आहे. प्रोमोमध्ये आकांक्षा चमोला आणि पामेला एका सेलमध्ये, तर राम कपूर आणि श्रेया कालरा दुसऱ्या सेलमध्ये दिसतात. ‘कंट्रोलर’ बनण्यासाठी या दोन्ही जोड्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळतो. त्यानंतर एका टास्कदरम्यान योगेश रावत आणि रितेश देशमुख यांच्यातही वाद झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

रितेश का संतापला?

या टास्कदरम्यान स्पर्धक योगेश रावत आणि सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं दिसतं. योगेश म्हणतो, “सर, जर हेच करायचं होतं तर मग…” त्यावर रितेश संतापतो आणि म्हणतो, “मला हे सांगू नकोस. माझ्यासमोर हे नाटक नाही चालणार.”

याच प्रोमोमध्ये आतापर्यंत चांगल्या मैत्रिणी असलेल्या माधुरी जैन आणि श्रेया कालरा यांच्यातही वाद होणार असल्याचं दिसतं. एका टास्कदरम्यान श्रेया संतापून माधुरीला, “माझ्या गेममध्ये पडू नकोस,” असं म्हणताना दिसते. याशिवाय, आतापर्यंत चांगली मैत्री असलेले पामेला आणि वरुण यांच्यातही जोरदार वाद होतो. पामेला वरुणला, “तू पुरुषच नाहीस,” असं म्हणत वरुणवर निशाणा साधते.

दरम्यान, या आठवड्यात मिड-वीक जजमेंट डे होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्याच्या मध्यातच एक किंवा अधिक स्पर्धक शोमधून निरोप घेताना दिसू शकतात. तसंच, रितेश देशमुखने याच आठवड्यात दोन स्पर्धकांना ‘लॉक अप २’मधून बाहेर काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या काही भागांमध्ये श्रेष्ठा अय्यर, सुनीता आहुजा आणि रियाज अली यांनी शोचा निरोप घेतला असून, सुनीता आहुजा यांनी प्रकृतीच्या कारणामुळे शो सोडला. अन्नावरून श्रेया कालरा आणि आकांक्षा चौधरी यांच्यात झालेला वाद, तर राम कपूर आणि शिल्पा शिंदे यांच्यातील मतभेद यामुळे सध्या ‘लॉक अप २’ अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.