Salman Khan Alliance : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा ‘अलायन्स’ शोमध्ये सहभागी झाला आहे. प्राइमवरील या शोमध्ये सोहेल खान हा स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली. सोहेलसह त्याची एक्स पत्नी सीमा सजदेहसुद्धा या शोमध्ये सहभागी झाली होती. सोहेल आणि सीमामध्ये पुन्हा निर्माण झालेली मैत्री आणि त्यांच्यातील बॉण्डिंग पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या नात्याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, शोमध्ये सलमान खान आल्यानंतर त्याने भाऊ सोहेलला सीमाबरोबरच्या नात्याबद्दल थेट विचारले. तसेच सलमानने त्याला या नात्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
सलमान खान ‘अलायन्स’मध्ये आल्यानंतर त्याने धाकटा भाऊ सोहेल खान याच्याबरोबर गप्पा मारल्या. यावेळी त्याला भावनिक आधार देत सलमानने सीमा व सोहेलच्या नात्यावर भाष्य केले. सलमान खान सोहेल खानला उद्देशून म्हणाला, “तू सगळा दोष स्वतःवर घेतला आहेस. मला माहिती आहे की हा निर्णय तुम्हा दोघांचा होता, असं तू कधीच म्हणणार नाहीस. मी सीमाच्या काही मुलाखती पाहिल्या आहेत. त्यामध्ये ती म्हणाली, ‘आमचं नातं विषारी झालं होतं, आमच्यात सतत भांडणं व्हायची.’ पण, प्रत्येक कपलमध्ये भांडणं होत असतात. एखाद्या नात्यात राहायचं की नाही राहायचं हा निर्णय त्या दोघांचाच असतो. भाऊ म्हणून मला माहिती आहे की तू तुला शक्य होतील ते सर्व प्रयत्न केले होते. सीमानेही तिला जमेल तसे प्रयत्न केले, पण त्या काळात परिस्थिती तुमच्या दोघांच्या बाजूने नव्हती.”
ती वेळ आपल्या कुटुंबासाठी खूपच त्रासदायक – सलमान खान
यानंतर सलमानने त्यांच्या नात्यातील दुरावा कसा वाढत गेला याबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, “जे काही प्रयत्न करण्याची गरज होती ते सगळे तू केले होते. हे सगळं एका फोटोमुळे सुरू झालं आणि हळूहळू वाढत गेलं. एक वेळ अशी आली की ते थांबवणं तुलाही शक्य झालं नाही. तू तिला समजावण्याचा आणि हे नातं टिकवण्याचा खूप प्रयत्न केलास. पण आता ते नातं संपलं आहे. परिस्थिती आता आधीसारखी नीट झाल्याचा मला आनंद आहे. तुझा मोठा भाऊ म्हणून मला माहिती आहे की ती वेळ तुझ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, सीमासाठी आणि मुलांसाठीही खूप अवघड होती आणि त्रासदायक होती.”
कोणाला तरी डेट कर अन् पुढे जा – सलमान खान
पुढे सलमान खान म्हणाला, “याआधी तुझं ब्रेकअप झालं होतं, पण तेव्हा तू असा कधीच एवढा खचला नव्हतास. ब्रेकअप झाल्यानंतर तू दोन-तीन दिवस दुःखी असायचास आणि मग पुढे जायचास. दोन-तीन नात्यांनंतर तू सीमाला भेटलास. मला अजूनही आठवतंय, ‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगच्या वेळी मला तुझा फोन आला होता. त्यानंतर आठवडाभरातच तू लग्न करणार असल्याचं सांगितलंस. त्या दिवसापासून ते तुम्ही वेगळे होईपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता. जी व्यक्ती नातं टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात, त्यांनाच सर्वांत जास्त त्रास होत असतो. पण, आता तू बरा असशील असं मला वाटतं आणि आता कोणाला तरी डेट कर आणि आयुष्यात पुढे जा,” असा सल्ला सलमान खानने सोहेल खानला दिला आहे.
दरम्यान, १९९८ मध्ये सोहेल खानने सीमा सजदेहबरोबर प्रेमविवाह केला होता. सीमा व सोहेल यांना निर्वाण व योहान अशी दोन अपत्य आहेत. सीमा व सोहेल यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. ‘अलायन्स’ या शोमध्ये पुन्हा हे दोघे एकत्र आले होते.
