Pahalgam Terror Attack: काही दिवसांपूर्वी भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर पाऊल उचललं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरून भारताने पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घातली. त्यामुळे कुठल्याही पाकिस्तानी कलाकारांचं इन्स्टाग्राम अकाउंट भारतात दिसत नाहीये. पण, ‘मेरे हमसफर’, ‘कभी मैं कभी तुम’ यांसारख्या पाकिस्तानी ड्रामामुळे भारतात लोकप्रिय झालेल्या हानिया आमिरला इन्स्टाग्रामवर पाहण्यासाठी तिच्या भारतीय चाहत्यांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा भारतात खूप मोठा चाहता वर्ग आहे. हानियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घातल्यानंतर भारतीय चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला आहे. भारतीय चाहते VPN द्वारे हानियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोहोचत आहेत. हेच पाहून हानिया भावुक झाली आणि ती काय म्हणाली? जाणून घ्या…
दरम्यान, हानिया आमिरसह फवाद खान, माहिरा खान, अतीफ अस्लम, अली जफर यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घातली आहे. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर हानियाबरोबर कशापद्धतीने जोडले याबद्दलचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये चाहते VPN चा वापर करून हानियाच्या इन्स्टाग्रामपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
हानियाच्या एका पोस्टवर चाहत्याने लिहिलं आहे की, आम्ही VPN लावून तुझ्यापर्यंत पोहोचत आहोत. टेन्शन घेऊ नकोस. यावर हानिया प्रतिक्रिया देत म्हणाली की, आता मी रडेन. सध्या हानियाच्या या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. चाहत्यांचा हा वेडेपणा पाहून सोशल मीडियावर लोक भारतीय चाहत्यांच्या निष्ठेचं कौतुक करत आहेत.
VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हे एक तांत्रिक साधन आहे, ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटवरील तुमचं लोकेशन ( स्थान ) बदलू शकता. जेव्हा एखादा वापरकर्ता VPN वापरतो तेव्हा त्याचा IP अॅड्रेस दुसऱ्या देशाचा असल्याचं दिसून येतं, ज्यामुळे तो तेथील जिओ-ब्लॉक केलेल्या साइट्स आणि अॅप्स वापरू शकतात. याच कारणामुळे चाहते भारतात बंदी घातलेल्या हानियाचे अकाउंट VPN द्वारे पाहू शकत आहेत.
दरम्यान, २२ एप्रिलला देशात खळबळ उडवणारी घटना घडली. गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झाला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. त्यामुळे २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. तसंच अनेकजण जखमी झाले. या हल्ल्याला १२ दिवस उलटले असून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा वाढत चालला आहे. भारत सरकार सतत पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करताना दिसत आहेत.