देशात करोनाचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस लाखो लोकांना करोनाची लागण होत आहे. वैद्यकीय सुविधाही बऱ्याच ठिकाणी अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अनेकांचे जीवही जात आहेत. अभिनेत्री पूजा भटने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजाने एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटमध्ये ती म्हणते, “कोणाला जिवंत राहिल्याचं गिल्ट येत आहे का? कारण मला येत आहे. जेव्हा कोणाचाही मृत्यू होतो, तेव्हा मला धक्का बसतो. सगळी व्यवस्था अयशस्वी झाली आहे. राजकीय वर्गाचे हात रक्ताने माखलेले आहेत. कारण, त्यांनी आधीपासून तयारी केली नाही, कारण सगळं ठीक आहे असा संदेश ते सारखा देत होते, कारण त्यांनी सगळं आपल्यावर सोडलं आहे.”

पूजाच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकजण म्हणत आहेत की त्यांना लाचार वाटत आहे. करोनाविरुद्धची लढाई दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. अशातच सर्वांनी एकत्र राहून या संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं जात आहे. काही राज्यात रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात लागू करण्यात आला आहे.

आणखी वाचा- Corona: भारतात तीन लाखांहून अधिक रुग्ण; जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद

अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही भारतातल्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिनेही लोकांना घरात राहण्याचा आग्रह केला आहे. याशिवाय प्रियांका लोकांच्या मदतीसाठी, त्यांना ऑक्सिजन, बेड आणि इतर गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती सतत लोकांना माहिती देत असते.