मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. आमिरच्या या चित्रपटाची खूप दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंडमुळे या चित्रपटाला मोठा फटका बसला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. बॉयकॉट ट्रेंडमुळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा – साऊथच्या ‘या’ सहा चित्रपटांशिवाय कोणते चालले? आर माधवनने उपस्थित केला सवाल

दरम्यान, या बॉयकॉट ट्रेंडवर खुद्द आमिर खान, करीना कपूर खान यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवली होती. आता अभिनेता आर. माधवन याने याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. तसंच बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचं आणि दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होण्यामागची काही कारणंही माधवनने सांगितली. माधवन बुधवारी मुंबईत त्याच्या आगामी ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटाच्या टीझर लॉन्च प्रसंगी उपस्थित होता. यावेळी त्याने लाल सिंग चड्ढा फ्लॉप होण्याबद्दल आणि बॉलिवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशावर आपले मत मांडले.

हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या वितरकांना आमिर खान नुकसान भरपाई देणार?, सत्य आलं समोर

लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या अपयशाबद्दल माधवन म्हणाला, “जर आम्हाला माहित असते की हा चित्रपट यशस्वी होणार नाही, तर आम्ही सर्वजण हिट चित्रपट बनवत असतो. कोणताही निर्माता आपण चुकीचा चित्रपट बनवत आहोत असा विचार करून चित्रपट बनवत नाही. त्यामागचा हेतू सकारात्मक असतो आणि मेहनतही असते. आतापर्यंत जे मोठे चित्रपट प्रदर्शित झालेत, त्यांचा हेतू हा एक चांगला चित्रपट बनवायचा आणि त्यात चांगलं काम करायचं हाच होता.”

दाक्षिणात्य चित्रपट हिट होण्याबद्दल तो म्हणाला, “काही मोजक्याच दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानंतर हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट चांगले काम करतात असा विचार करणे चुकीचे आहे. साऊथ इंडस्ट्रीतील मोजकेच चित्रपट आतापर्यंत सुपरहिट ठरले आहेत. तसेच याला पॅटर्न देखील म्हणता येणार नाही. कारण बाहुबली १, बाहुबली २, आरआरआर, पुष्पा, केजीएफ: भाग १ आणि केजीएफ: भाग २ हे फक्त सहा सुपरहिट चित्रपट आहेत, त्याला आपण ट्रेंड म्हणू शकत नाही. चांगले चित्रपट आले तर ते नक्कीच हिट होतील, मग ते कोणत्याही भाषेतले असो.” प्रेक्षकांना चांगला कंटेंट दिल्यास ते सिनेमागृहात जाऊन कोणत्याही भाषेची पर्वा न करता सिनेमा पाहतील, असा विश्वास माधवनने व्यक्त केला.

‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यावर आमिरने घेतली राज ठाकरेंची भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

माधवनने हिंदी चित्रपटांच्या फ्लॉपचे श्रेय करोना नंतरच्या काळात प्रेक्षकांच्या बदललेल्या पसंतींना दिले. “करोनानंतर, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे लोक ज्या प्रकारचे चित्रपट पाहतील, तसेच चित्रपट आपल्याला बनवावे लागतील. आपल्याला आणखी थोडे प्रगतीशील बनावे लागणार आहे,” असं तो म्हणाला.

दरम्यान, माधवन कुकी गुलाटी दिग्दर्शित ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.