बॉलिवूडमधील जुन्या चित्रपटांचे वेड सर्वांनाच असते. जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आजही अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या यादीत आहेत. या चित्रपटांची गाणी किंवा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. १९७१ साली प्रदर्शित झालेला 'आनंद' हा चित्रपट त्यापैकीच एक. राजेश खन्ना व अमिताभ बच्चन अभिनित ‘आनंद’ हा बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. नुकतंच 'आनंद' या चित्रपटाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 'आनंद' या चित्रपटाच्या रिमेकची लवकरच निर्मिती केली जाणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. तरण आदर्श यांनी नुकतंच याबाबत एक ट्विट शेअर केले आहे. "आनंद चित्रपटाच्या रिमेकची अधिकृत घोषणा. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे", असे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे. "या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगचे काम सुरु आहे. निर्मात्यांनी अद्याप दिग्दर्शक आणि स्टार कास्ट निश्चित केलेली नाही", असेही तरण आदर्श यांनी म्हटले. 'आनंद' चित्रपटात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट एका कॅन्सर रुग्णावर आधारित होता. ज्यात राजेश खन्ना यांनी कॅन्सर रुग्णाची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन हे या चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत दिसले होते. एवढा गंभीर आजार असूनही राजेश खन्ना आपले आयुष्य किती मस्त जगतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. ऋषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आनंद'मध्ये राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आनंद' चित्रपटाच्या संवाद आणि पटकथा लेखनाचे काम गुलझार यांनी केले होते.