राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मित्र आणि नातेवाईक तसेच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी राजू श्रीवास्तव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. अशात राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा पहिल्यांदाच आपल्या दिवंगत वडिलांबद्दल बोलली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अंतराने वडील रुग्णालयात असतानापासून ते त्यांच्या निधनानंतर आईची अवस्था या सर्वच गोष्टींवर भाष्य केलं आहे. तसेच हा काळ तिच्या कुटुंबीयांसाठी कठीण असल्याचंही तिने म्हटलं आहे.

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी आज रात्री माझ्या आईसोबत (शिखा श्रीवास्तव) मुंबईला जाणार आहे. ती ठीक नाहीये. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे.” वडील रुग्णालयात असताना एक शब्दही बोलले नाहीत, असेही तिने यावेळी सांगितलं. ती म्हणाली, “बाबा रुग्णालयात असताना काहीच बोलले नव्हते.”

आणखी वाचा- राजू श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या रोहन जोशीने मागितली माफी; म्हणाला, “थोडा विचार…”

अंतरा आणि शिखा श्रीवास्तव यांनी मुंबईत राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले आहे. ही प्रार्थना सभा मुंबईतील इस्कॉन जुहू येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अंतरा श्रीवास्तवने सांगितले की, “नंतर कानपूरमध्येही आणखी एक पूजा होणार आहे. आम्ही लवकरच दिल्लीला परतणार आहोत. अनेक विधी चालू आहेत. कानपूर हे वडिलांचे घर होते. त्यामुळे तिथेही पूजा करावी लागेल.”

दरम्यान याआधी राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा हिनेही दिवंगत कॉमेडियन खरोखरच फायटर असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या, “मला सध्या बोलता येत नाही. मी आता काय शेअर करू किंवा काय बोलू? त्यांनी खूप संघर्ष केला, मला खरोखर आशा होती आणि आम्ही ते ठीक होतील अशी प्रार्थना करत होतो. पण असे झालेले नाही. मी एवढेच म्हणू शकते की ते खरोखरच एक योद्धा होते.”

आणखी वाचा- बिग बींचा आवाज ऐकल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना आली होती शुद्ध? अमिताभ म्हणतात, “डोळे उघडले अन्…”

राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १० ऑगस्ट रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी झाली. ४१ दिवस रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असलेल्या राजू श्रीवास्तव यांनी अखेर जगाचा निरोप घेतला.